Home Blog Page 8

राजकारणातील सह्याद्री!

 

 

शरद गोविंदराव पवार यांचा जन्म १२ डिसेंबर १९४० रोजी झाला , आज शरद नावाचा सह्याद्री ८५ वर्षांचा झाला आहे. पण,त्याची उंची, कणखरपणा आणि ताट असलेला स्वाभिमान कुठेच कमी झालेला नाही. सह्याद्री वयाने कमी किंवा असतो का? तो पर्वत चट्टान आहे तो त्याच डौलाने उभा आहे.वादळे आली गेली मात्र,तो उभाच आहे. पद्मविभूषण शरद पवार चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. तसेच पी.व्ही. नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात संरक्षण मंत्री म्हणून आणि मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात कृषी मंत्री म्हणून त्यांनी काम केले आहे.देशाला कृषी मंत्रालय आणि कृषी मंत्री आहे याची जाणीव शरद पवार कृषिमंत्री झाले तेव्हा कृषी मंत्रालयाची ओळख झाली यापेक्षा कल्पना आली.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसपासून वेगळे झाल्यानंतर १९९९ मध्ये त्यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार गट पक्षाचे विद्यमान अध्यक्ष आहेत. भारतीय संसदेच्या वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेत राष्ट्रवादी काँग्रेस शिष्टमंडळाचे नेतृत्व करतात. तसेच महाविकास आघाडी या प्रादेशिक राजकीय आघाडीचे अध्यक्ष आहेत.जेव्हा शरद पवारांनी जसा पुलोदचा प्रयोग केला तसा प्रयोग त्यांनी महाविकास आघाडी स्थापन करून केला.मात्र, यावेळी काँग्रेस सोबत होती तर पुलोदच्या प्रयोगावेळी त्यांनी काँग्रेस पक्षाशी बंडखोरी केली होती. असो,ते केवळ राजकीय कारकीर्दीत स्थिरावले नाहीत तर राजकारणाच्या बाहेर, शरद पवार यांनी २००५ ते २००८ पर्यंत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष आणि २०१० ते २०१२ पर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष म्हणून काम केले. ऑक्टोबर २०१३ ते जानेवारी २०१७ या कालावधीत ते मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष होते.२०१७ मध्ये, भारत सरकारने त्यांना पद्मविभूषण हा भारताचा दुसरा-सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान केला.या विविधांगी अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचा आज ८५ वा वाढदिवस. एवढ्या वयातही ते कधी थकत नाहीत ही अत्युच्च शक्ती येते कुठून?हा महाराष्ट्रातील प्रत्येकाला पडलेला सवाल.ज्याच उत्तर अनुत्तरीतच.

१० जून इ.स. १९९९ रोजी शरद पवारांनी काँग्रेस पक्षाशी दोन हात करून, त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. इ.स. १९९९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर कोणत्याही पक्षाला अथवा आघाडीस बहुमत मिळाले नव्हते. त्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी झाली होती आणि विलासराव देशमुख राज्याचे मुख्यमंत्री झाले. इ.स. २००४ मधील लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष केंद्रात मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारमध्ये सामील झाला. २२ मे इ.स. २००४ मध्ये शरद पवारांनी देशाचे कृषिमंत्री म्हणून सूत्रे हाती घेतली. २९ मे इ.स. २००९ रोजी केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांना कृषी, ग्राहकांशी संबंधित बाबी, अन्न आणि सार्वजनिक वितरण खात्यांची धुरा त्यांना देण्यात आली.कृषी मंत्री म्हणून त्यांनी स्वतः ची आणि कृषी मंत्रालयाची ओळख देशात कानाकोपऱ्यात निर्माण केली. जुलै इ.स. २०१० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर पक्षकार्याला अधिक वेळ देण्याची इच्छा असल्याचे सांगून पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्याकडे त्यांनी आपल्यावरील कार्यभार कमी करण्याची विनंती केली आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.इ.स. २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणूकीत राष्ट्रवादी पक्षाला ५४ जागा मिळाल्या. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांचे मिळून महाआघाडीचे सरकार महाराष्ट्रामध्ये निर्माण करण्यात शरद पवार यांचा मोलाचा सहभाग होता. शरद पवार हे नाव नाही तर ते एक महाराष्ट्राला आणि देशाला न उलगडलेले कोडे आहे. कारण, शरद पवार यांना सत्तेची ऊब जवळ हवी वाटते.हे त्यांच्या राजकीय कारकीर्दीतील घडामोडींवरून लक्षात येते. पुलोदचा प्रयोग असेल किंवा महाराष्ट्रातील सरकार स्थापन करण्यासाठी महाविकास आघाडीचा प्रयोग असेल. या न उलगडलेल्या कोड्याला पुतणे आणि विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोड्यात टाकले , जुलै २०२३ मध्ये, अजित पवार यांनी शरद पवारांच्या विरोधात बंड केले आणि सत्ताधारी भाजप- शिवसेना सरकारमध्ये सामील झाले आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली, राष्ट्रवादीच्या बहुसंख्य विद्यमान आमदारांनी पवार यांच्या समर्थनार्थ पक्ष सोडला. पण, शरदचंद्र नावाचा हिमालय डगमगला नाही .कारण, हिमालयाला धडका दिल्याने त्याचा टवका निघू शकतो.पण, हिमालय जमीनदोस्त झालेला ऐकिवात आहे काय?

अभेद्य राजकीय कारकीर्द आणि अफाट शक्ती उर्जा आणि सकारात्मक दृष्टिकोन असलेल्या कुणासाठी टणक तर कठीण कधी मृदू असलेल्या पद्मविभूषण खा.शरदचंद्र पवार यांना वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा!

– पदमाकर उखळीकर ,

(लेखक पीएम फाऊंडेशनचे अध्यक्ष असून,मुक्त पत्रकार आहेत.)

kalpadmakarukhlikar@gmail.com.

काँग्रेस पक्षातच अखेरचा श्वास घेतला!

 

 

एका मराठी माणसाची राजकारणातील झेप ही किती असू शकते किंबहुना राजकारणात कोणतेही महत्त्वाकांक्षा न ठेवता केवळ पक्षाला समर्पित आणि पक्षाचा आदेश सर्वोच्च माणून अगदी स्वच्छ आणि आपल्या राजकीय कारकीर्दीत एकही डाग लागणार नाही असे वर्तन राजकीय नेत्यांचे सध्यातरी शक्य आहे काय? अगदी स्वच्छ राजकारणी आताच्या पिढीत दुरापास्त. पक्षाशी एकनिष्ठ राहून, पक्षाकडे कोणतीही अपेक्षा न ठेवता आपल्या कार्यकर्तृत्वाने मराठवाड्यातील नेता केंद्रीय गृहमंत्री पद भूषवतो हे मराठवाड्यासाठी आदर्श आणि अभिमानाची बाब आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांनी राजकीय जीवनात अनेक महत्त्वाची पदं त्यांनी मिळवली. खरंतर कुठलाही राजकीय पुढारी हा राजकीय पक्षात काम करत असताना एक विशिष्ट महत्त्वकांक्षा घेऊनच पक्षाला झोकून देतो मात्र, शिवराज पाटील चाकूरकर यांच्या पिढीतील राजकीय पुढारी निस्वार्थ भावनेने पक्षाच्या विचारधारेशी एकनिष्ठ राहून काम करत असत. शिवराज पाटील चाकूरकर काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहिले आणि अखेरचा श्वास सुद्धा काँग्रेस पक्षात घेतला. आपली राजकीय कारकीर्द ज्या पक्षाने इतिहासात नोंद होईल अशी घडवली त्याच पक्षाशी दोन हात करणारे नेते जागोजागी दिसतात. मात्र ज्या पक्षात राजकीय कारकीर्द घडली त्याच पक्षात अखेरचा श्वास शिवराज पाटील चाकूरकर यांनी घेतला. हा आदर्श महाराष्ट्रासाठी तर आहेच परंतु मराठवाड्यातील नेत्यांसाठी सुद्धा आदर्श राहिलं. अगदी राजकारणात सक्रिय नसताना सुद्धा त्यांनी कोणत्या पदाची अपेक्षा ठेवली नाही. किंबहुना कोणत्याही इतरत्र पक्षात त्यांनी प्रवेश केला नाही ही त्यांची ओळख महाराष्ट्र विसरणार नाही. काँग्रेसमध्ये काम करीत असताना सुद्धा त्यांनी कधीच पदाची लालसा ठेवून काम केले नाही. असे आजकाल किती नेत्यांना जमेल हा प्रश्न.

भारताच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री इंदिरा गांधी ,माजी प्रधानमंत्री राजीव गांधी आणि संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्षा सोनिया गांधी या तिन्ही गांधींसोबत त्यांनी काम केले. राजकारणात पदं ही कर्तुत्वाने आणि नेतृत्वाने मिळत असतात . पदांची अपेक्षा ही कधी शिवराज पाटील चाकूरकर यांना शिवली नाही. इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील काम केलेल्या पिढीतील नेता मराठवाड्यातील असणे हे मराठवाड्यासाठी अभिमानास्पद आहे. इतिहासात याची नोंद ंद घेतली जाईल यात शंका नाही. या मराठवाड्याच्या सुपुत्राची आणि मराठी माणसाची राजकीय कारकीर्द देदीप्यमान राहिली आहे. त्यांच्या राजकीय कार्यकाळात कधी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा डाग लागला नाही हे त्यांची आणखी8 एक ओळख. त्यांच्यावर गृहमंत्री असताना अनेक आरोप झाले मात्र भ्रष्टाचाराबाबत त्यांच्यावर आजवर कोणीही आरोप करू शकला नाही. हे ही तितकेच महत्त्वाचे. शिवराज पाटील चाकूरकर राजकारणापासून गेल्या दशक भारत दूर राहिले असले तरी त्यांनी इतर कुठल्याही पक्षाशी जवळीक केली नाही हे त्यांचं वैशिष्ट्य वाखाण्याजोग आहे. महाराष्ट्रच नाही तर सबंध भारतभर शिवराज पाटील चाकूरकर या नावाने त्यांची ओळख होती आणि कायम राहील. त्यांची राजकीय कारकीर्द डोळे दिपवून टाकणारी आहे.

शिवराज विश्वनाथ पाटील चाकुरकर यांचा जन्म १२ ऑक्टोबर १९३५ रोजी तत्कालीन हैदराबाद , आता महाराष्ट्र , भारतातील संस्थानातील लातूर जिल्ह्यातील (मराठवाडा ) चाकुर गावात झाला. त्यांनी हैदराबाद येथील उस्मानिया विद्यापीठातून विज्ञान विषयात पदवी मिळवली आणि मुंबई विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण घेतले . १९६७-६९ दरम्यान ते स्थानिक प्रशासनात (लातूर नगरपालिका) सहभागी होते. १९७२ ते १९८० पर्यंत, ते १९७२ ते १९७८ आणि १९७८ ते १९८० अशा दोन टर्मसाठी महाराष्ट्र विधानसभेच्या लातूर शहराचे आमदार होते. या काळात त्यांनी सार्वजनिक उपक्रम समितीचे अध्यक्ष, उपमंत्री (कायदा आणि न्यायव्यवस्था, सिंचन, प्रोटोकॉल), विधानसभेचे उपसभापती आणि विधानसभेचे अध्यक्ष अशी विविध पदे भूषवली. १९८० मध्ये ते लातूर मतदारसंघातून ७ व्या लोकसभेवर निवडून आले .१९८० च्या दशकात इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी संरक्षण मंत्री म्हणून काम पाहिले. त्यानंतर सलग सातवेळा लोकसभा निवडणूक जिंकली.१९९९ पर्यंत त्यांनी १९८०, १९८४, १९८९, १९९१, १९९६, १९९८ आणि १९९९ अशा सलग सात लोकसभा निवडणुका जिंकल्या. २००४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार रूपाताई पाटील निलंगेकर यांच्याकडून पराभव पत्करावा लागला . सलग सात वेळा लोकसभा निवडणूक जिंकणे ही वाटते तितकी साधी बाब नाही.

शिवराज पाटील चाकुरकर २००४ ते २००८ पर्यंत भारताचे गृहमंत्री आणि १९९१ ते १९९६ पर्यंत लोकसभेचे १० वे अध्यक्ष होते. २०१० ते २०१५ पर्यंत पंजाब राज्याचे राज्यपाल आणि चंदीगड केंद्रशासित प्रदेशाचे प्रशासक म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली.२००८ च्या मुंबई हल्ल्यानंतर झालेल्या व्यापक टीकेनंतर पाटील यांनी ३० नोव्हेंबर २००८ रोजी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि हल्ल्यांना कारणीभूत ठरलेल्या सुरक्षेतील त्रुटीची नैतिक जबाबदारी स्वीकारली. आज असे किती राजकारणी आहेत जे स्वतः जबाबदारी घेऊन पदाचा राजीनामा देतात? त्यांच्यासाठी सुद्धा शिवराज पाटील चाकूरकर यांनी वस्तूपाठ करून दिला आहे.

इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये संरक्षण राज्यमंत्री (१९८०-८२) म्हणून प्रथम प्रवेश केल्यानंतर , त्यांना वाणिज्य मंत्रालयाचा स्वतंत्र कार्यभार देण्यात आला (१९८२-८३), जिथून त्यांना विज्ञान आणि तंत्रज्ञान, अणुऊर्जा, इलेक्ट्रॉनिक्स, अवकाश आणि महासागर विकास (१९८३-८४) येथे हलवण्यात आले. १९८३-८६ दरम्यान, ते सीएसआयआर इंडियाचे उपाध्यक्ष होते . त्यांनी संरक्षण, परराष्ट्र व्यवहार, वित्त, संसद सदस्यांचे वेतन आणि भत्ते यासह विविध समित्यांवरही काम केले. राजीव गांधी सरकारमध्ये ते कार्मिक, संरक्षण उत्पादन मंत्री होते आणि नंतर नागरी विमान वाहतूक आणि पर्यटन खात्याचा स्वतंत्र कार्यभार सांभाळला. सोनिया गांधी यांनी पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर त्यांनी पक्षात अनेक महत्त्वाची पदे भूषवली . १९९२ मध्ये भारतातील उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार सुरू करण्यासाठी ते ओळखले जातात . १९९९ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान ते पक्षाच्या जाहीरनामा समितीचे अध्यक्ष होते.संसद ग्रंथालय इमारतीचे बांधकाम आणि संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या प्रश्नोत्तराच्या तासाचे थेट प्रक्षेपण यासह लोकसभेच्या कामकाजाचे प्रसारण यासारख्या उपक्रमांना सुरुवात केली किंवा त्यात योगदान दिले.१९९१ ते १९९५ दरम्यान, ते विविध आंतरराष्ट्रीय संसदीय परिषदांमध्ये भारतीय संसदीय प्रतिनिधी मंडळांचे सदस्य म्हणून त्यांनी काम केले. एका मराठी व मराठवाड्याच्या7 सुपुत्राची राजकीय उंची आणि राजकारणातील संयम , सुसंस्कृतपणा ,एकनिष्ठता आजच्या राजकारण्यांसाठी एक धडा आहे.१२ डिसेंबर २०२५ रोजी त्यांचे निधन झाले. या मराठवाड्याच्या सुपुत्राला मराठवाडा , महाराष्ट्र नाही तर देश कायम स्मरणात ठेवील!

 

– पदमाकर उखळीकर ,

(लेखक मुक्त पत्रकार आहेत.)

मो.९९७५१८८९१२ .

kalpadmakarukhlikar@gmail.com.

महाराष्ट्राच्या प्रश्नांची जाण आणि सामाजिक भान असलेल नेतृत्व!

 

 

महाराष्ट्राच्या राजकारणावर प्रभाव पाडतील असे हाताच्या बोटावर मोजण्याइतके मोजके नेते असतील. त्यात गोपीनाथ मुंडे ठळकपणे उठून दिसतात. आपल्या ३५ वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत अनेक चढउतार अनुभवलेल्या या नेत्याने राजकारणात आपले स्वतःचे असे विशेष स्थान निर्माण केले आहे. मुंडे-महाजन जोडगोळीने मराठवाडा, विदर्भ आणि पश्‍चिम महाराष्ट्र सर्वत्र दौरे केले होते. मुंडे हे मराठवाडा विद्यापीठ आंदोलनात सहभागी होते. त्यांनी नामांतर आंदोलनात तुरुंगवासही भोगला होता. संघाच्या शिस्तबद्ध पठडीतून बाहेर निघून पक्षाला सर्वसमावेशक आणि देशव्यापी स्वरूप देण्यासाठी वसंतराव भागवतांनी या जोडगोळीला बळ दिले. एका अर्थाने सरंजामी नेतृत्वाला पर्याय म्हणून भागवतांनी मराठवाड्यामध्ये एक सक्षम पर्याय निर्माण केला. सुरुवातीपासून मतदारसंघावर लक्ष ठेवावं असं प्रमोद महाजनांचं म्हणणं होतं. त्यामुळे मुंडेचे लक्ष नेहमीच मराठवाडा आणि विशेषतः मतदारसंघावर असायचे. वयाच्या ऐन पंचविशीत इ.स. १९७० मध्ये परळीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे (अ.भा.वि.प.) काम करीत असतानाच ते संघाच्या संपर्कात आले. त्यांचे कर्तृत्त्व बहरू लागले. अशातच मुंडेंच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात इ.स. १९७८ साली बीड जिल्ह्यातून निवडणूक लढवून झाली. त्यानंतर त्यांनी कधी मागे वळून पाहिले नाही. आज भाजपची रणनीती बदलली असून सरंजामी नेतृत्व पुढे आले आहे . या सरंजामशाही विरोधात एखाद्या बहुजन नेत्याने बहुजनांचे विचार कृतीत आणण्यास सुरुवात केली की भाजप त्यांचे बळ काढून घेते. कारण वसंतराव भागवतांसारख्ये बळ देणारे नेते सध्या भाजपमध्ये किती उरले आहेत हा प्रश्न. कारण, गोपीनाथ मुंडे यांच्या समकालीन नेत्यांची आज पक्षामध्ये वाताहत होतांना दिसते आहे.१९७८ मध्ये गोपीनाथ मुंडे यांनी पहिल्यांदा अंबाजोगाई तालुक्यातील उजनी गटातून जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत नशीब आजमावले आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पहिल्याच प्रयत्नात इ.स. १९७८ च्या बीड जिल्हापरिषदेची निवडणुकीत ते रेणापूर (उजनी) मतदारसंघातून राज्यभरात सर्वाधिक मताधिक्य घेऊन निवडून आले.१९८० मध्ये ते पहिल्यांदा रेणापूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. त्यानंतर १९९० आणि १९९५ मध्ये याच मतदारसंघातून ते निवडून आले.१९८० ते ८२ दरम्यान भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्षपद, व त्यानंतर भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्षपद भूषविले. राज्यात युतीची सत्ता असताना त्यांची उपमुख्यमंत्रिपदी वर्णी लागली. तर २००९ मध्ये ते पहिल्यांदा लोकसभेवर निवडून आले.

वयाच्या ३५ व्या वर्षी इ.स. १९८० मध्ये मुंडे यांची भारतीय जनता युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. पुढे इ.स. १९८२ मध्ये ते महाराष्ट्र भाजपचे सरचिटणीस झाले. इ.स. १९८५ मध्ये झालेल्या बीड लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीत पराभव झाला. मुंडे पुन्हा एकदा सचिव झाले. इ.स. १९८० साली बीड जिल्ह्यातील गेवराई मतदारसंघातून मुंडे यांनी विधानसभेत प्रवेश केला. परंतु इ.स. १९८५ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये मुंडे यांना गेवराई मतदारसंघातच काँग्रेसचे पंडितराव दौंड यांनी अष्टरंगी सामन्यात पराभूत केले. इ.स. १९८५ मधील ही हार वगळता मुंडे यांच्यावर निवडणुकीच्या आखाड्यात धूळ खाण्याचा प्रसंग आला नाही.या अपयशानंतर त्यांनी आपले वक्तृत्व, नेतृत्व अधिकच विकसित केले आणि सातत्याने काम केले. सत्ता नसतानाही अनेक प्रश्‍न त्यांनी तडीस नेले. त्यांनी आपला मतदारवर्ग पक्ष आणि समाजाच्या सीमांपलीकडे तयार केला. म्हणून पक्षामध्ये ज्येष्ठ व अनुभवी नेत्यांची संख्या मोठी असूनही दोन पिढ्यांना मागे सारत मुंडे यांची इ.स. १९८६ साली प्रदेशाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आणि येथूनच भाजपच्या वाटचालीला वेगळे वळण मिळाले. इ.स. १९८७ मध्ये त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर महाराष्ट्रात कर्जमुक्ती मोर्चा काढून शासनास ‘कर्जमुक्ती’ करण्यास भाग पाडले. हा भाजपचा इतिहासातील सर्वात मोठा मोर्चा मानला जातो.

इ.स. १९९२ ते इ.स. १९९५ या कालावधीत मुंडेंनी विधानसभेतील प्रमुख विरोधी पक्षनेतेपद सांभाळले. विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद मिळवल्यानंतर मुंडे यांचा वारू महाराष्ट्रभर उधळला. विरोधी पक्षनेते असताना राजकारणाच्या गुन्हेगारीकरण विरोधात त्यांनी आवाज उठविला. अनेक प्रश्न अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडून, विरोधी पक्षनेत्यांची स्वतंत्र प्रतिभा निर्माण केली. गोपीनाथजींनी त्यावेळी मुद्याचं राजकारण करण्यावर भर दिला. आरक्षण, मण्डल आयोग, शेतकऱ्यांचे प्रश्न आदी प्रश्न गांभीर्याने पाहिले. मुंडे यांच्या राजकीय प्रवासाचा विचार केला तर इ.स. १९९० ते इ.स. १९९५ हा त्यांच्या जीवनातील सर्वोत्तम काळ होता. जवळपास त्यांनी एकट्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात जोरदार आघाडी उघडली होती आणि पवारांना जेरीस आणले होते.

विधानसभेच्या इ.स. १९९५ मध्ये झालेल्या निवडणुकांत मुंडेंनी भाजपला अभूतपूर्व यश मिळवून दिले. गोपीनाथ मुंडे यांनी शरद पवार यांच्याविरोधात जोरदार उघडलेली आघाडी यांचे प्रतिबिंब मतपेटीत उमटले. काँग्रेस पक्षाचा राज्यात प्रथमच पराभव झाला. भाजप-शिवसेना युतीस २८८ पैकी १३८ जागा मिळाल्या तर काँग्रेस पक्षास ८० जागांवर समाधान मानावे लागले. या निवडणुकीनंतर सत्तेवर आलेल्या भाजप–सेनेच्या मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले व राज्याचे नवे उपमुख्यमंत्री म्हणून गोपीनाथ मुंडे यांचा १४ मार्च इ.स. १९९५ रोजी शपथविधी झाला. इ.स. १९९५ ते इ.स. १९९९ या कालखंडादरम्यान ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते. इ.स.२००९ च्या ऑक्टोबर महिन्यातील निवडणूक त्यांनी बीड लोकसभा मतदारसंघातून लढवली. बीड लोकसभा मतदारसंघातून म्हणून निवडून येताना भाजपचे आमदार गोपीनाथ मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या रमेश कोकाटे यांना १ लाख ४० हजार ९५२ मतांनी पराभव केला होता. बीड लोकसभेच्या अटीतटीच्या निवडणुकीच्या निमित्ताने भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा पालवे निवडणुकीच्या प्रचारात उतरल्या होत्या. त्यांनी ओट्यावर, बाजेवर, चावडीत जाऊन लोकांच्या भेटीगाठी घेतल्या. ३०० गावांमध्ये सभा आणि ४०० गावांना भेटी दिल्या. यामधून त्यांनी आपले नेतृत्वगुण सिद्घ केले. २०१४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी बीड लोकसभा मतदारसंघातून दणदणीत विजय मिळवला व त्यांनी केंद्रीय मंत्री म्हणूनही काम केले आणि २०१४ मध्ये त्यांचे दुर्दैवाने निधन झाले. महाराष्ट्राच्या प्रश्नांची जाण आणि सामाजिक भान ठेवून त्यांनी आपले काम सुरू ठेवले आहे. राज्यासमोरील प्रश्न सोडवण्याची तळमळ आणि त्यासाठी अथक मेहनत घेण्याची तयारी तसेच प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी प्रसंगी रस्त्यावर उतरण्याची धडाडी, लोकांचे संघटन करण्याचे कौशल्य, संसदीय कामकाजाचा गाढा अभ्यास, अत्यंत प्रभावी वक्तृत्व आणि कर्तृत्त्व असे सर्वगुणसंपन्न नेतृत्व भारतीय जनता पक्षाला लाभले, हे त्या पक्षाचे भाग्य तर आहेच; पण महाराष्ट्राचेही भाग्य आहे, असेच म्हणावे लागेल.

 

– पदमाकर उखळीकर,

(लेखक मुक्त पत्रकार आहेत.)

मो.९९७५१८८९१२ .

kalpadmakarukhlikar@gmail.com.

महसूलची गौडगाव येथे गोदावरी पात्रात कारवाई खबऱ्यांना चकवा देत नायब तहसीलदार धोपे व पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांनी थेट गोदावरी नदीपात्रात जाऊन तराफे केले नष्ट

परभणी(प्रतिनिधी)जिल्ह्यामध्ये पाथरी तालुका हा नेहमीच अवैध वाळू उपसण्यासाठी ओळखला जाणारा तालुका आहे या तालुक्यामध्ये गोदावरी नदीचे पात्र मोठे असल्याने नाथरा ते मुद्गल पर्यंत ठिकठिकाणी तराफे व इतर अवजाराच्या साह्याने मोठ्या प्रमाणावर अवैध वाळूचा उपसा करण्यात येतो. परंतु जिल्ह्यातील अवैध वाळू उपसा लक्षात घेता जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी महसूल मधील सर्वच तहसीलदार यांना अवैध वाळू उपसा थांबवण्यासाठी आदेश दिले. या आदेशानंतर परभणी जिल्ह्यामध्ये चालू असलेला ठिकठिकाणी अवैध वाळु उपसा रोखण्यासाठी दररोज कुठे ना कुठेतरी कारवाई महसूल प्रशासनाकडून करण्यात येऊ लागली.याचाच एक भाग म्हणून काल दिनांक 14 डिसेंबर शनीवार रोजी उपविभागीय अधिकारी संगीता चव्हाण व पाथरी तहसीलचे तहसीलदार शंकर हंदेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार रमेश धोपे व तलाठी तायनाक यांनी दुचाकी वर गोदावरी पात्रात गेले.

असता त्यांना गोदावरी नदीपात्रामध्ये तीन तराफ्याच्या साह्याने वाळू उपसा चालू असल्याचे दिसून आले.परंतु नायब तहसीलदार रमेश धोपे व तलाठी यांना पाहताच दोन तराफे घेऊन वाळू उपसा करणारे गोदावरी नदीपात्राच्या पलीकडील बाजूस जाऊन बसले तर नायब तहसीलदार रमेश धोपे व तलाठी तायनाक यांच्या हाती एक तरफा लागला. सदर घटनेची माहिती धोपे यांनी उपविभागीय अधिकारी संगीता चव्हाण व तहसीलदार शंकर हंदेश्वर यांना फोनवरून कळवली व आणखी कर्मचारी व पोलीस बंदोबस्त पाठवण्याची विनंती केली.

यावेळी उपविभागीय अधिकारी संगीता चव्हाण यांनी पाथरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांना सदर घटना सांगुन घटनास्थळी जाण्यासाठी कळवले व तहसीलदार शंकर हंडेश्वर यांनी दोन तलाठी तहसीलची गाडी घटनास्थळी पाठवली.पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे व इतर कर्मचारी तात्काळ घटनास्थळी पोहोचल्यानंतर सदरील ठिकाणी आढळून आलेले साहित्य व तराफा नायब तहसीलदार रमेश धोपे,पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे,तलाठी तायनाक,तलाठी गाडेकर,जोशी इत्यादींनी पेट्रोल टाकून नष्ट केले. सदर कारवाईने गौडगाव येथील वाळू माफियात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

गुंज येथे जप्त अवैध वाळू घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाटप  

पाथरी(प्रतिनिधी)तालुक्यात अवैध वाळू उपसाला रोख लगावून,गुंज येथे जप्त करण्यात आलेली वाळू घरकुल योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना वाटप करण्यात आली आहे. उपविभागीय अधिकारी संगीता चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ८ डिसेंबर रोजी केलेल्या कारवाईत अंदाजे चाळीस ब्रास वाळू जप्त करण्यात आली, आणि ९ डिसेंबरला घरकुलासाठी पाच ब्रास प्रती लाभार्थी वाटप करण्यात आले. 

तालुक्यातील मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसाला प्रतिबंध घालण्यासाठी जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांच्या निर्देशानुसार उपविभागीय अधिकारी संगीता चव्हाण व तहसीलदार शंकर हांदेश्वर यांनी कठोर कारवाई केली आहे. ८ डिसेंबर रोजी पाथरी तालुक्यातील गुंज या ठिकाणी सुमारे चाळीस ब्रास अवैध वाळूचा साठा जप्त करण्यात आला. ही कारवाई स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आली. नंतर, जप्त केलेला वाळू गटबद्ध पद्धतीने घरकुल योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना वाटप झाला. प्रत्येक लाभार्थ्याला पाच ब्रास वाळू देण्यात आली. यामध्ये गुंज,तुरा, मसला खुर्द,सारोळा इत्यादी गावातील लाभारती होते. यावेळी तहसीलदार शंकर हांदेश्वर, नायब तहसीलदार धोपे, मंडळ अधिकारी बागुल, तलाठी नितीन गाडेकर, तलाठी सानप,तलाठी घाडगे यांच्या उपस्थितीत गुंज गावचे ग्रामसेवक देखील होते. 

हा उपक्रम घरकुल योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या घरबांधणीसाठी आवश्यक वाळू पुरवण्याचा एक महत्त्वपूर्ण प्रयत्न आहे. तसेच, अवैध वाळू उपसाच्या विरोधात प्रशासनाच्या दक्षतेचेही द्योतक ठरतो. जप्त वाळूची घरकुल लाभार्थ्यांना वाटप करणारी ही घटना शासनाच्या वाळू नियंत्रण धोरणाशी सुसंगत आहे आणि यामुळे घरकुल योजना सुरळीत अंमलात येण्यास मदत होईल.

असंघटित कामगारांचा आधारवड हरपला

असंघटित कामगारांचा आधारवड हरपला

 

असंघटित कामगारांच्या हक्कांसाठी झटणारे ज्येष्ठ कामगार नेते, पुरोगामी चळवळीचे आधारवड, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ बाबा आढाव यांचे सोमवारी (दिनांक ८ डिसेंबर ) रोजी वृद्धापकाळाने वयाच्या ९५ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने कष्टकरी, श्रमजीवी वर्गासाठी आयुष्य वेचणारे नेतृत्व हरपले. त्यांच्या निधनाने या वर्गाचेच नव्हे तर संपूर्ण समाजाचे मोठे नुकसान झाले आहे. डॉ बाबा आढाव यांनी कष्टकरी, श्रमजीवी वर्गासाठी जितके कार्य केले तितके कार्य याआधी कोणीही केले नाही. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सत्यशोधक चळवळीचा वारसा सांगणाऱ्या बाबा आढाव यांचा जन्म १ जून १९३० रोजी पुण्यात झाला. ते नाना पेठेतील नामांकित आयुर्वेदिक डॉक्टर होते. बाबा आढाव यांनी वयाच्या २३ व्या वर्षीच म्हणजे १९५३ सालीच सामाजिक चळवळीत भाग घ्यायला सुरुवात केली. त्यावेळेच्या तरुणांना समाजवादी विचारांची भुरळ पडली होती तशी भुरळ बाबा आढाव यांनाही पडली म्हणूनच त्यांनी समाजवादी पक्षात प्रवेश करून सामाजिक कार्यास सुरुवात केली. १९७० सालापर्यंत बाबा आढाव समाजवादी पक्षाबरोबर राहिले या काळात त्यांनी अनेक आंदोलन केले. ते पुण्याचे नगरसेवकही होते. नाना पेठ हा शहरातील बाजार पेठेचा भाग असल्याने अनेक व्यवसायातील कामगार, हमाल तिथे येत असत त्यामुळे कामगारांना येणाऱ्या अडचणी बाबा आढावा यांच्या लक्षात येऊ लागल्या हमालांचे शोषण होऊनही त्यांना कुठलेही कायदेशीर संरक्षण नसल्याचे त्यांनी पाहिले. या गोष्टीचा त्यांच्या मनावर खोल परिणाम झाला. अखेर १९६६ साली त्यांनी आपला चांगला चाललेला डॉक्टरकीचा व्यवसाय सोडला आणि कामगारांच्या पाठीशी उभे राहण्याचे ठरवले. १९७० नंतर मात्र बाबा आढाव यांनी राजकारणातून फारकत घेऊन कष्टकरी श्रमजीवी वर्गासाठी अर्थात असंघटित वर्गासाठी काम करण्याचे ठरवले. या वर्गाला त्यांचे अधिकार आणि हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी अनेक आंदोलने केली. नडलेल्या, नाकारलेल्या उपेक्षित घटकांपर्यंत स्वातंत्र्याचे नि सार्वभौम लाभ पोहचवण्याचे काम त्यांनी केले. हमालपंचायत, , रिक्षा पंचायत, मोलकरीण पंचायत, कागद – पत्रा – काच वेचक कष्टकरी पंचायत, पथारी व्यावसायिक पंचायत, टेम्पो पंचायत अशा अनेक असंघटित कामगाराच्या संघटना त्यांनी बांधल्या. या संघटनांच्या माध्यमातून त्यांनी असंघटित कामगारांना न्याय, सन्मान आणि सामाजिक सुरक्षा मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. हमाल पंचायतची स्थापना ही त्यांच्या कार्याचा महत्वाचा टप्पा ठरली. हमाल पंचायतीच्या माध्यमातून बाबा आढाव यांनी पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील हमालांना संघटित केले. जातीय भेदभावा विरुद्ध लढण्यासाठी त्यांनी एक गाव एक पाणवठा या क्रांतिकारी चळवळीचे नेतृत्व केले आणि समाजात समता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न त्यांनी आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत सुरू ठेवला. महाराष्ट्रातल्या सामाजिक चळवळीत जवळपास पाच दशकांहून अधिक काळ बाबा आढाव यांचा सहभाग राहिला. बाबा आढावांच्या नेतृत्वाचे सर्वात मोठे महत्त्वाचे वैशिष्टे म्हणजे त्यांना असणारे राजकीय व्यवहार्यतेचे भान. असंघटित कामगारांचे संघटन करताना शोषणाच्या कमी अधिक प्रमाणात लढत राहणे, असंघटितांसाठी लढताना शासनाशी आर्थिक मागण्या न करता स्वायत्तपणे सहकारी संस्थांमधून सामाजिक सुरक्षितता मिळवण्याचे प्रयत्न करणे आणि सामाजिक प्रबोधन घडवणे. संशोधन संस्थांचे सहाय्य घेऊनही संघर्षात्मक राजकारणाचे प्राधान्य कायम ठेवणे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे पक्षीय राजकारणात सहभागी न होता देखील कळीच्या मुद्यावर राजकीय भूमिका घेण्याचे धाडस दाखवणे अशा सर्व पातळ्यांवर बाबा आढावांमध्ये व्यवहार्यतेचे भान स्पष्ट होत जाते. संघर्ष आणि प्रबोधन अशा दुहेरी मार्गांनी झालेली त्यांच्या नेतृत्वाची वाटचाल पुरोगामी राजकारणाचा एक महत्वाचा दस्तऐवज आहे. बाबा आढाव यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीतील अढळ तारा निखळला. त्यांच्या निधनाने असंघटित कामगारांचा आधारवड हरपला. बाबा आढाव यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

 

श्याम ठाणेदार

दौंड जिल्हा पुणे

गोदावरी पात्रात महसूल कर्मचाऱ्यांची दुपारी कारवाई; तर सकाळीच गोदावरी पात्रातील तराफे गायब. महसूल मध्येच वाळू माफियांचे खबरी; गोदावरी पात्रात असलेले जुने तराफे पथकाकडून करण्यात आले नष्ट

 

पाथरी(प्रतिनिधी) जिल्ह्यात अवैध रेती (वाळूचे) उत्खननावर लगाम घालण्यासाठी महसूल विभागाने जिल्हाभरात धडाकेबाज कारवाई करायला सुरू केल्या असून पाथरी तालुक्यातील मौजे गौडगाव येथे छापा टाकण्यात आला परंतु त्या ठिकाणी पथक जाण्यापूर्वीच चालू असलेले तराफे गोदावरी नदीपात्रातून वाळू माफियांकडून गायब करण्यात आले. परंतु पथकाला अवैधरित्या उत्खनन करण्यासाठी वापरण्यात येणारी जुनी सामग्री सापडली ती सामग्री मात्र पथकाकडून नष्ट करण्यात आली.

सविस्तर बातमी अशी की, जिल्ह्यात गोदावरी नदी पात्रामधून मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या वाळूचे उत्खनन चालू असल्याने जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी जिल्ह्यातील अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी पथके तयार केले आहेत

.या पथकामार्फत जिल्हाभरातील गोदावरी नदीपात्रामध्ये ठिकठिकाणी छापे मारून सदरील ठिकाणी अवैध वाळू उत्खननासाठी सापडलेली सामग्री त्याच ठिकाणी नष्ट करण्यात येत आहे.

याचाच एक भाग म्हणून काल दिनांक ८ डिसेंबर रोजी दुपारी पाथरीच्या उपविभागीय अधिकारी संगीता चव्हाण व तहसीलदार शंकर हंदेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार धोपे, मंडळ अधिकारी बागुल,तलाठी साजिद, तलाठी तायनाक, तलाठी गाडेकर, कोतवाल चव्हाण यांच्या पथकाने गौडगाव येथे कारवाई करण्यासाठी गुंज येथे जाऊन गोदावरी नदी पात्रातील एका बोटीच्या सहाय्याने गौडगाव गाठले परंतु त्या ठिकाणी चालू असलेले तराफे वाळूमाफियांकडून सकाळीच गायब करण्यात आल्याने सदरील ठिकाणी पथकाच्या हाती वाळू माफियांची जुनी सामग्री सापडली यावरच पथकाला समाधान मानावे लागले ती सामग्री लागलीच पथकाने नष्ट केली.

 

महसूल मध्येच वाळू माफियांचा खबरी

गौडगाव येथील गोदावरी पात्रामध्ये सहा ते सात तराफ्याच्या साह्याने दिवसभर वाळू उपसा करण्यात येतो.एका तराफ्यावर आठ ते दहा परराज्यातील मजुराच्या सहाय्याने किमान एक ब्रास वाळू एका वेळेस काढण्यात येते. सदरील तराफ्यांना लोखंडे अँगल,दोरखंड व हिरव्या रंगाची नेट लावलेली असते परंतु या ठिकाणी कारवाईसाठी निघालेल्या पथकाची खबर महसूल मधील खबऱ्याने गौडगाव येथील वाळू माफीयांना अगोदरच दिल्याने गोदावरी नदी पात्रामध्ये चालू असलेली नवीन तराफे हे गोदावरी पात्रातून हटवण्यात आले या ठिकाणी पथक गेल्यावर त्यांना त्या ठिकाणी काही जुनी सामग्री आढळून आली.याच सामग्रीवर सदरील पथकाने समाधान मानून सदरील सामग्री नष्ट केली. परंतु महसूल मधील तो खबरी कर्मचारी कोण?याचा तपास वरिष्ठ अधिकारी करणार का? आणि त्या खबऱ्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कुठली कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे आहेत ७ डिसेंबर रविवारी घेण्यात आलेल्या तरफ्यांची फोटो

Oplus_131072
Oplus_131072
Oplus_131072

ही आहेत ८ डिसेंबर सोमवारी पथकाने केलेल्या कारवाईतील तराफ्यांचे फोटो

 

 

महापरिनिर्वाण दिनानिमित्त हजारोंद्वारे महामानवास अभिवादन : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर सकाळपासून रात्री उशीरापर्यंत अभिवादनासाठी गर्दी

 

परभणी,दि.06(प्रतिनिधी) : महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शनिवार 6 डिसेंबर रोजी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास विविध पक्ष, संघटना व संस्थांच्या पदाधिकार्‍यांसह कार्यकर्ते व हजारो नागरीकांनी पुष्पहार अर्पण करुन व पुष्पवृष्टी करीत अभिवादन केले.
भारतीय बौध्द महासभा जिल्हा शाखेच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ शनिवारी अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाची सुरुवात भगवान गौतम बुद्ध व डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून झाली. यावेळी सामुहीक बुध्द वंदना घेण्यात आली. पूजनीय भन्ते, पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, भारतीय बौद्ध महासभेचे राज्य सचिव बाबासाहेब धबाले, ज्येष्ठ नेते बी. एच. सहजराव, दशरथ गायकवाड, उपाध्यक्ष डी. आय. खेडकर, व्ही. व्ही. वाघमारे, प्रा. डॉ. प्रविण कनकुटे, विश्‍वनाथ झोडपे आदी मान्यवरांनी प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. सभेचे अध्यक्ष डी. आय. खेडकर यांच्या हस्ते पंचरंगी धम्मध्वज अर्ध्यावर फडकावण्यात आला. समता सैनिक दलाच्या डी. के. टोंपे, नागनाथ सोनुले आणि राहुल कोसे यांनी मानवंदना दिली. त्यानंतर भंते पी. धम्मानंद व भंते धम्मपाल यांनी उपस्थितांना त्रिशरण पंचशीलाचे ग्रहण करून दिले. बौद्धाचार्यांनी गाथा सादर करताच परिसर शांतता, करुणा आणि समतेच्या संदेशाने भारावून गेला.
कार्यक्रमास ज्येष्ठ नेत्या राणुबाई वायवळ, अविनाश सरवदे, भारत खाडे, बी. जी. शिंदे, राजकुमार, गोपीनाथ कांबळे, शंकर भारशंकर, भगवान काकडे, डॉ. अगस्ती इंगोले, किशनराव लझडे, सूर्यकांत साळवे, भारत देवरे, पंडित तुपसमुंद्रे, एम. एम. बरे, पी. एल. वानखेडे, मुकुंद खाडे, एस. एम. कांबळे, अतुल वैराट, राजकुमार साळवे, चुडाजी धबाले, बी. बी. भराडे, भगवान सांडवे, सुभाष मकरंद, नागोराव लहाडे, अरविंद पांडव, रमेश घनघाव, बापुराव मोरे, प्रसाद कनकुटे, संजय बगाटे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

अभिवादनाकरीता दिवसभर उसळली गर्दी…
येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉ. आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करीत अभिवादनाकरीता सकाळपासून सायंकाळी उशीरापर्यंत मोठ्या प्रमाणावर गर्दी उसळली. विविध संस्था, संघटना, प्रतिष्ठाने, मित्रमंडळ, पक्ष किंवा अन्य वसाहतीतील संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी, सामान्य नागरीकांनी भावपूर्ण आदरांजली वाहिली. शहरातील शैक्षणिक संस्था, शासकीय निमशासकीय कार्यालये किंवा अन्य ठिकाणीही अभिवादनासह अन्य छोटे मोठे कार्यक्रम, उपक्रम राबविण्यात आले.

वाळूच्या २६ वाहनांसह ३ कोटी ३५ लाखांचा मुद्देमाल जप्त -बोरी पोलिसांची धडक कारवाई; १७ जणांवर गुन्हा दाखल

वाळूच्या २६ वाहनांसह ३ कोटी ३५ लाखांचा मुद्देमाल जप्त

 

-बोरी पोलिसांची धडक कारवाई; १७ जणांवर गुन्हा दाखल

 

बोरी(प्रतिनिधी)जिल्हाधिकारी यांच्या परवान्याचे उल्लंघन करत दुधना नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या रेतीच्या धक्क्यावर नियोजनबद्ध कारवाई करत पोलीसांनी अवैध खननाला मोठा आळा घातला आहे. पिंपळगाव गायके (ता. जिंतूर) येथील दुधना नदीपात्रात गुरूवारी(दि. ४) सायंकाळी ५ वाजता ही कारवाई करण्यात आली.

पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस अधीक्षक जिवन बेनिवाल व त्यांचे पथक बोरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर धोंडगे, पीएसआय महादेव गायकवाड आणि इतर पोलीस कर्मचारी यांच्या सहकार्याने राबविण्यात आली. या प्रकरणात फिर्यादी पोलिय हवालदार सिद्धार्थ कोकाटे यांनी तक्रार नोंदविली आहे. कारवाई बोरी पोलीस ठाणे हद्दीत पार पडली असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. जिल्हाधिकारी परभणी यांनी उत्खननासाठी दिलेल्या परवान्यातील अटी व शर्तींचे प्राथमिक तपासात उल्लंघन झाल्याचे समोर आले आहे. अधिकृत पावत्यांशिवाय रेती भरलेल्या वाहनांची वाहतूक, परवान्याच्या मर्यादेपेक्षा जास्त उत्खनन, नदीपात्रात अवैधपणे रेतीचा साठा ठेवणे, पर्यावरण संरक्षण अधिनियमाचे उल्लंघन, तसेच गौण खनिज अधिनियमाचे नियम मोडून खनन केल्याचे निदर्शनास आले.

या प्रकरणात १७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाईदरम्यान २६ वाहने ताब्यात घेण्यात आली. त्यात हायवा, डंपर, ट्रॅक्टर – ट्रॉली, पोकलेन मशीन, चारचाकी वाहने आणी मोटारसायकलींचा समावेश आहे. याशिवाय नदीपात्रात साठवलेली ९० ब्रास वाळू जप्त करण्यात आली. वाहनांची व यंत्रसामग्रीची स्वतंत्र किंमत जाहीर करण्यात आली असून संपूर्ण कारवाईतील जप्त मुद्देमालाची एकत्रित रक्कम ३ कोटी ३५ लाख रुपये आहे. या रकमेमध्ये एका चारचाकीत आढळलेली ५ लाख रुपयांची रोख रक्कमदेखील समाविष्ट आहे. या प्रकरणी बोरी पोलिसांत गुन्हे संख्या – ३०६/२०२५ नुसार कलम ३०३(२), ३(५) बीएनएस, तसेच गौण खनिज अधिनियम ४८(७)(८) आणि पर्यावरण संरक्षण अधिनियम कलम ५ व १५ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

वाळू उत्खननासाठी वापरलेल्या यंत्रसामग्रीची मालकी, वाहतुकीचे जाळे, आर्थिक व्यवहार आणि या अवैध खननात सामील असलेल्या इतर घटकांविषयी सखोल तपास सुरू असून पुढील काही दिवसांत या रॅकेटबाबत आणखी महत्त्वाचे उलगडे होण्याची शक्यता आहे. दुधना नदीपात्रात अवैध उत्खनन दीर्घकाळ सुरू असल्याच्या तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे सातत्याने येत होत्या. पर्यावरणाला होणाऱ्या हानीकडे लक्ष देत प्रशासनाने कडक भूमिका घेतली असून अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

या कारवाईमुळे अवैध उत्खननात गुंतलेल्या बेकायदेशीर घटकांमध्ये मोठी खळबळ निर्माण झाली आहे. जिंतूरचे सहाय्यक पोलिस अधिक्षक जीवन बेनिवाल, सहायक पोलिस निरीक्षक रामेश्वर धोंडगे व या कार्यवाहीत सहभागी असलेल्या पोलिसांचे नागरिकांमधून कौतुक होत आहे.

 

________

परभणीत गुटखा विक्रीला ‘सोईस्कर दुर्लक्षा’ची साथ! ‘मोका’ कारवाईचा नुसता ‘राग’; तरुणाई कॅन्सरच्या विळख्यात.

परभणीत गुटखा विक्रीला ‘सोईस्कर दुर्लक्षा’ची साथ! ‘मोका’ कारवाईचा नुसता ‘राग’; तरुणाई कॅन्सरच्या विळख्यात.

परभणी:( दि.०३ ) महाराष्ट्रात अन्न व औषध प्रशासनाने गुटखा,पान मसाला आणि सुगंधित तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी घातलेली असताना, परभणी जिल्ह्यामध्ये मात्र या प्रतिबंधित वस्तूंची खुलेआम विक्री सुरू आहे.अन्न व औषध प्रशासनाच्या परभणीतील अधिकाऱ्यांचे याकडे असलेले ‘सोईस्कर दुर्लक्ष’ आणि प्रशासकीय यंत्रणेतील काही अधिकाऱ्यांची एकाच कार्यालयात दीर्घकाळ असलेली ठाण, यामुळे जिल्ह्यात बेकायदेशीर गुटखा विक्रेत्यांचे मनोधैर्य वाढले असल्याचे गंभीर चित्र दिसत आहे.

 

कलम 328’चा धाक नाही, बेकायदेशीर गुटखा विक्री जोमात

प्रचलित भारतीय दंड संहितेतील कलम 328 (विषप्रयोग/धोकादायक पदार्थ देणे) नुसार काही प्रकरणांतील गुन्हे अत्यंत गंभीर असतानाही,परभणीतील गुटखा माफिया या कायद्याला जुमानायला तयार नाहीत. गुटख्यासारख्या आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक पदार्थांची सर्रास विक्री होत असल्याने तरुण पिढी मोठ्या प्रमाणात या व्यसनात ओढली जात आहे. एका बाजूला कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराचा विळखा विक्राळ रूप धारण करत असताना, दुसरीकडे परभणी जिल्ह्यात गुटखा विक्री आणि वाहतुकीसंदर्भात होणाऱ्या अत्यंत तुरळक कारवाया प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गहन प्रश्नचिन्ह उभे करत आहेत.

 

शाळांच्या १०० मीटर आवारातही कारवाई नाही!

 

सर्वात धक्कादायक बाब म्हणजे,जिल्ह्यातील शाळांच्या शंभर मीटर आवारातही गुटखा विक्री करणाऱ्या पानटपऱ्यांवर कोणतीही ठोस कारवाई झाल्याचे अद्याप ज्ञात नाही. कायद्याचे उल्लंघन करून शालेय परिसराच्या जवळच तरुणाईला व्यसनाच्या गर्तेत ओढण्याचे काम सुरू असतानाही प्रशासन मूग गिळून गप्प आहे.

 

‘मोका’ कारवाईचा नुसता ‘पुन्हा राग’

बेकायदेशीर गुटखा विक्री करणाऱ्यांवर ‘मोका’ (MCOCA) कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याचे आश्वासन राज्याच्या वतीने अनेक वर्षांपासून दिले जात आहे.मात्र, त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी अद्यापही झालेली नाही.यातच, आता अन्न व औषध मंत्री नरहरी झिरवळ यांनी पुन्हा एकदा प्रतिबंधित गुटखा विक्रीबाबत ‘मोका’ अंतर्गत कारवाई करणार असल्याचा ‘राग’ आवळला आहे.गुटखा माफियांच्या वाढलेल्या मनोधैर्यामुळे आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेत परभणी जिल्ह्यातील तरुणाईच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मंत्र्यांनी केवळ घोषणा न करता, परभणीतील अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यालयात आवश्यक बदल करून आणि तातडीने कठोर कारवाई करून या बेकायदेशीर धंद्यावर नियंत्रण मिळवावे, अशी मागणी आता जोर धरत आहे.