Home Blog Page 5

आत्मा अंतर्गत शेतकरी पुरस्कारासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

 

परभणी दि. 09 (प्रतिनिधी) : कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) मार्फत जिल्ह्यातील शेती क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांची निवड करून त्यांना जिल्हास्तरीय शेतकरी पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
जिल्हास्तरावर एकूण ५ शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार असून त्यामध्ये खुला प्रवर्ग २ शेतकरी, महिला १ शेतकरी, अनुसूचित जाती / जमाती २ शेतकरी अशा प्रकारे एकूण पाच शेतकऱ्यांना पुरस्कार वितरित करण्यात येणार आहेत.

शेतकऱ्यांची निवड ही त्यांनी अवलंबलेल्या विविध पीक पद्धती, नाविन्यपूर्ण शेती तंत्रज्ञान व उत्पादनक्षमतेच्या आधारे करण्यात येणार आहे. ज्या शेतकऱ्यांना जिल्हास्तरीय पुरस्कारापेक्षा वरिष्ठ असलेले राज्यस्तरीय पुरस्कार यापूर्वी प्राप्त झाले आहेत, असे शेतकरी या पुरस्कारासाठी पात्र राहणार नाहीत. तरी पात्र व इच्छुक शेतकऱ्यांनी दि. १६ जानेवारी २०२६ पर्यंत आपले अर्ज प्रकल्प संचालक, आत्मा कार्यालय येथे सादर करावेत. अर्जाचा विहित नमुना संबंधित कार्यालयात उपलब्ध आहे. असे आवाहन प्रकल्प संचालक, आत्मा श्री. दौलत सु. चव्हाण यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

smrutigandh.com
smrutigandh.com

नांदेड येथील “हिंद-दी-चादर” कार्यक्रम ऐतिहासिक करावा कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्वांचा समावेश आवश्यक मान्यवरांचे पत्रकार परिषदेत आवाहन  

 

नांदेड, दि. 9 जानेवारी :- “हिंद-दी-चादर” श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांच्या 350 शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे 24 व 25 जानेवारी 2026 रोजी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी सर्व समाजातील नागरिकांनी उपस्थित राहून हा कार्यक्रम ऐतिहासिक करावा, असे आवाहन आज आयोजित पत्रकार परिषदेत मान्यवरांनी केले.

सचखंड पब्लिक स्कूल येथील गुरु ग्रंथ साहिब भवन येथे आयोजित या पत्रकार परिषदेस जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, तख्त सचखंड श्री हजूर साहिब गुरुद्वारा अबचलनगर नांदेडचे मुख्य जथ्थेदार संत बाबा कुलवंत सिंगजी यांच्यासह भाई जोसिंदर सिंगजी, भाई राम सिंगजी, भाई कश्मीर सिंगजी, भाई गुरमीत सिंगजी, संत ज्ञानी हरनाम सिंग जी तसेच गुरुद्वारा लंगर साहिबचे संत बाबा बलविंदर सिंगजी, समिती अध्यक्ष डॉ. विजय सतबीर सिंग, सरजीत सिंग गिल, राज्यस्तरीय समितीचे समन्वयक रामेश्वर नाईक, महेंद्र रायचूरा (धर्म जागरण क्षेत्रीय प्रमुख पश्चिम क्षेत्र ) महंत सुनिल महाराज, महंत जितेंद्र महाराज, राष्ट्रीय बंजारा परिषदेचे संस्थापक किशनराव राठोड आदी उपस्थित होते.

 

राज्य शासनाचा अल्पसंख्याक विकास विभाग, राज्यस्तरीय समिती, शीख, सिकलीकर, बंजारा, लबाना, सिंधी, मोहयाल, वाल्मीकी, उदासीन व भगत नामदेव (वारकरी संप्रदाय) व इतर सर्व समाज यांच्या संयुक्त विद्यामाने हिंद-दी-चादर कार्यक्रमाचे आयोजन नांदेड शहरातील मोदी मैदान येथे करण्यात आले आहे. जथेदार साहेब भाई कुलवंत सिंग जी, संत ज्ञानी हरनाम सिंग जी यांनी हिंद-दी-चादर या कार्यक्रमाचे महत्त्व विषद करून शीख व इतर समाजाचे कार्यक्रमाच्या अनुषंगाने असणाऱ्या योगदानाबद्दल माहिती दिली. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र शासन करत असलेल्या महत्त्वपूर्ण सहकार्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले. भाविकांनी या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी केले

जिल्हाधिकारी श्री.कर्डिले म्हणाले की, महाराष्ट्र शासन व विविध समाज यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या “हिंद दी चादर” कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सध्या तयारी वेगाने सुरु आहे. भाविकांनी कुठल्याही प्रकारची अडचण भासणार नाही याची पूर्णत: काळजी घेतली जाईल. कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्यासाठी विविध 25 समित्यांची स्थापन करण्यात आली असून समित्यांवर सोपविलेल्या कामाप्रमाणे नियुक्त अधिकारी व कर्मचारी दक्षतेने कामे करीत आहेत. भाविकांसाठी जिल्हानिहाय पार्किंगची ठिकाणे निश्चित करण्यात आली असून निवासासाठी शहरातील शाळा, महाविद्यालये व मोकळ्या जागा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. वाहतूक व्यवस्थेचे सुसूत्र नियोजन करण्यात आले असून आवश्यक वाहनांची व्यवस्था देखील करण्यात येत आहे. नांदेड हे रेल्वेमार्गावर असल्याने रेल्वे विभागाच्या सहकार्याने अधिकाधिक भाविकांना रेल्वे सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. लंगर, निवास, पाणी व वाहतूक व्यवस्थेचा दैनंदिन आढावा घेतला जात असून आरोग्य सेवांसाठी विविध रुग्णालयांमार्फत वैद्यकीय सुविधा पुरविण्यात येणार आहेत. कार्यक्रमस्थळी विविध आरोग्य स्टॉल उभारण्यात येणार आहेत. कार्यक्रमाच्या प्रचार-प्रसिद्धीसाठी विविध शाळांमध्ये स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून येत्या १५ जानेवारीपासून प्रभातफेऱ्या काढण्यात येणार आहेत.

 

राज्यस्तरीय समिती समन्वयक रामेश्वर नाईक म्हणाले की, शहिदी समागम केवळ धार्मिक कार्यक्रम नसून तो सर्वधर्म समभाव, मानवता, संविधानिक मूल्ये व सामाजिक ऐक्याचा संदेश देणारा ऐतिहासिक उपक्रम आहे. या शहिदी समागम उपक्रमांची सुरुवात नागपूर येथे यशस्वीरित्या पार पडलेली असून त्याच उपक्रमाचा पुढील महत्त्वाचा टप्पा म्हणून नांदेड येथे दिनांक 24 व 25 जानेवारी 2026 रोजी दोन दिवसांचा भव्य शहिदी समागम कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध राज्यांचे मुख्यमंत्री व मान्यवर उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम ऐतिहासिक करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. या कार्यक्रमाची मोठया प्रमाणात प्रचार-प्रसिद्धी करून आपल्या नांदेड जिल्ह्याच्या नावलौकिकात भर घालावी.

जनगणना कामासाठी अचूक नियोजन व अंमलबजावणी आवश्यक -जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण

 

पहिल्यांदाच होणाऱ्या डिजिटल जनगणना अधिकारी-कर्मचारी यांचे प्रशिक्षण संपन्न

 

परभणी, दि. 07 (प्रतिनिधी) : जनगणना 2027 पूर्वतयारी प्रशिक्षण कार्यशाळेत जनगणना कामासाठी अचूक माहिती संकलनासाठी योग्य नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी सर्व नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिले.अद्‌यावत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून माहिती संकलन करण्यात येणार आहे. अचूक विश्वासार्ह लोकसंख्या आकडेवारी मिळविण्यासाठी मोबाईल अॅप्लिकेशनचा वापर करण्यात येणार आहे. संपूर्ण प्रकियेच्या देखरेखेसाठी केंद्रीय पोर्टल कार्यान्वित राहणार आहे. त्यामुळे जनगणना संबंधीत सर्व चार्ज अधिकारी कर्मचारी यांनी गट नियोजन, पर्यवेक्षक, प्रगणक यांच्या नियुक्तीबाबत आवश्यक नियोजन तसेच जनगणना प्रक्रियेतील प्रत्येक तरतूद काळजीपूर्वक समजून घेऊन अमंलबजावणी करण्याचे निर्देश अधिका-यांना देण्यात आले.

महाराष्ट्र जनगणना संचालनालय व केंद्रीय गृह मंत्रालय यांच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात पुर्वतयारी कार्यशाळा पार पडली. जनगणना संचानालयाचे सहायक संचालक प्रविण भगत व अरुण साळगांवकर यांनी संगणकीय सादरीकरण व प्रश्नोत्तराच्या माध्यमातून सुलभ पध्दतीने प्रशिक्षण दिले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांच्यासह महानगरपालिका उपआयुक्त, सर्व तहसिलदार, न.प. मुख्याधिकारी, नायब तह‌सिलदार, सहाय्यक महसुल अधिकारी, मंडळ अधिकारी, नगररचनाकार व जनगणना लिपीक अशा विविध विभागाचे अधिकारी / कर्मचारी उपस्थित होते.जनगणना प्रक्रियेच्या पहिल्या टप्यामध्ये घरयादी व घरगणना ही मे/जून 2026 मध्ये होणार असुन त्याबाबत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणालाही प्रारंभ झाला आहे. राष्ट्रीय जनगणनेचा दुसरा टप्पा फेब्रुवारी-मार्च 2027 मध्ये होणार आहे.

जनगणनेचे काम अत्यंत महत्वाचे आहे. त्यामुळे जनगणना कामाशी संबंधित अधिकारी, कर्मचारी यांनी प्रशिक्षण, आढावा बैठकीस हजर राहणे व प्रत्यक्ष सोपविण्यात आलेली जबाबदारी अचूकपणे पार पाडणे व प्रशिक्षण दिलेल्या सूचनाचे काटेकोर पालन करून कामकाज पार पाडावे असे निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांनी यावेळी सुचित केले.

दुचाकी – कार अपघातात तीन किर्तनकारांचा मृत्यू  -परभणी-जिंतूर रस्त्यावरील झरी परिसरातील घटना 

परभणी(प्रतिनिधी)तालुक्यातील पिंपळा येथे किर्तनसेवा आटोपून आपल्या गावाकडे निघालेल्या तिघा किर्तनकारांचा झरी परिसरात परभणी – जिंतूर राष्ट्रीय महामार्गावर कार व दुचाकी यांच्यात भीषण अपघात होऊन मुत्यु झाल्याची घटना शनिवारी(दि. १०) मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास घडली.

माऊली दिगंबरराव कदम(वय ३०), प्रसादराव कदम(वय ४५) दोघे रा. बोर्डी ता. जिंतूर आणि दत्ता माणिकराव कऱ्हाळे(वय ३०) रा. मुडा ता. जिंतूर अशी मयत किर्तनकारांची नांंवे आहेत. परभणी तालुक्यातील पिंपळा येथे किर्तनसेवा आटोपून शनिवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास दुचाकी क्रं – एमएच – २२ एएक्स ९५७६ द्वारे गावाकडे परतत असताना जिंतूर – परभणी राष्ट्रीय महामार्गावर झरी परिसरातील निम्न दुधना कालवा परिसरात परभणीच्या दिशेने येत असलेली कार क्रं – एमएच २९ बीव्ही ७७९० ची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात कार आणी दुचाकीचा चुराडा झाला. अपघात एवढा जोराचा होता की दोन्ही वाहने रस्त्याच्या बाजूला फेकली गेली.

घटनेची माहिती मिळताच अपर पोलिस अधिक्षक सुरज गुंजाळ, उपविभागीय अधिकारी चंद्रसेन देशमुख, ग्रामीण पोलिसांचे सहायक पोलिस निरीक्षक जीवन राजगुरू आदींनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तात्काळ परभणी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून तिघाही किर्तनकारांना मयत घोषित केले.

या प्रकरणी परभणी ग्रामीण पोलिसांत घटनेची नोंद करण्यात आली असून पोलिस अधिक तपास करीत आहेत. अपघाताच्या या भीषण घटनेमुळे बोर्डी आणि मुडा या गावांवर शोककळा पसरली आहे.

 

_

‘परभणी दत्तक घेऊ’ पण राष्ट्रवादी’स सत्ता द्या : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे परभणीच्या जाहीर सभेतून आवाहन

 

परभणी,दि.09(प्रतिनिधी) : परभणी महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीच्या माध्यमातून परभणीकरांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हातात सत्ता द्यावी, आपण परभणी दत्ता घेवू अन् सर्वांगिण विकासाचा मार्ग खूला करु, असे आश्‍वासन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी दिले.

महानगरपालिका निवणूकीच्या प्रचारार्थ शुक्रवारी (दि.09) उपमुख्यमंत्री पवार यांची छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळा परिसरात सायंकाळी जाहीर सभा आयोजित करण्यात आली. त्याप्रसंगी ते बोलत होते. खासदार श्रीमती फौजिया खान, आमदार राजेश विटेकर, माजी आमदार अ‍ॅड. विजय गव्हाणे, प्रथम महापौर तथा महानगर जिल्हाध्यक्ष प्रताप देशमुख, अक्षय देशमुख, माजी आमदार डॉ. मधुसुदन केंद्रे, संतोष बोबडे यांच्यासह अन्य नेते व पदाधिकारी व्यासपीठावर विराजमान होते.

आपल्या भाषणातून उपमुख्यमंत्री पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष परभणीत सुध्दा एकत्रितपणे निवडणूक लढवित आहेत. या पक्षाने सर्व धर्म व जाती-पातीच्या उमेदवारांना उमेदवारीत प्राधान्य दिले आहे. फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारधारेवरच पक्षाद्वारे वाटचाल सुरु आहे. त्यामुळे कृतीसुध्दा तशीच आहे. ज्येष्ठांबरोबर नवख्यांनासुध्दा उमेदवारीत प्राधान्य दिले आहे. या जून्या पिढीचा अनुभव व नव्या पिढीचे वर्तमान आणि भविष्याबाबतच्या संकल्पना या प्रत्यक्षात उतराव्यात असे प्रयत्न राष्ट्रवादीद्वारे केले जाणार आहेत.

  पिंपरी चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रात राष्ट्रवादीने केलेल्या विकास कामांचा परभणीकरांनीसुध्दा अनुभव विचारावा, त्या पध्दतीने परभणीतसुध्दा काय काय करता येईल या पध्दतीने विचार करावा, असे आवाहन करतेवेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी राज्य व केंद्र सरकारच्या निधीशिवाय विकास अशक्य आहे. त्यामुळे या दोन्ही सरकारच्या माध्यमातून काय काय करता येईल ते आपण निश्‍चितच परभणीकरांकरीता करु, असा विश्‍वास पवार यांनी व्यक्त केला.

महापालिकेंतर्गत भूमीगत गटार योजना, सुधारित पाणी पुरवठा योजना, पंतप्रधान आवास योजना किंवा अन्य महत्वाकांक्षी योजनांना राज्य सरकारने मंजूरी बहाल केली आहे. कोट्यवधींची तरतूदसुध्दा केली आहे. टप्प्या टप्प्याने निधी वितरित केला जाईल, सर्व कामे चांगली अन् दर्जेदार व्हावी या दृष्टीनेही पूर्णतः लक्ष केंद्रीत केले जाईल, परभणीच्या बाजूचे दोन्ही वळण रस्ते मार्गी लागावेत या साठीही प्रयत्न होतील, महापालिकेचे उत्पन्न वाढावे या दृष्टीने व्यापारी संकुले किंवा अन्य मार्गाद्वारे स्व उत्पन्न वाढविले जाईल, वैद्यकीय महाविद्यालयाच्या उभारणीबरोबरच मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचीसुध्दा उभारणी केली जाईल, त्याद्वारे सर्वसामान्य रुग्णांना सर्व प्रकारच्या सोयी सुविधा या जिल्हास्थानीच मिळाव्यात या दृष्टीने प्रयत्न केले जातील, कॅन्सर हॉस्पिटलचीसुध्दा उभारणी होईल. सीबीएसई अभ्यासक्रमाच्या शाळा, मराठी माध्यमांच्या शाळांचे पुनर्जीवर, एआय तंत्रज्ञानावर आधारित अभ्यासक्रमाबरोबर अन्य योजनासुध्दा मार्गी लावल्या जातील, आपला तो शब्द आहे. तो शब्द आपण आजपर्यंत पाळला आहे, असे ते म्हणाले.

राजकीय इच्छाशक्ती असेल तरच सर्वकाही शक्य आहे. त्यामुळेच परभणी महापालिकेस जीएसटीपोटी मोठ्या प्रमाणावर अनुदान मिळावे, महापालिकेंतर्गत नोकरभरतीची प्रक्रिया पूर्ण व्हावी, महापालिकेच्या कारभारात आमूलाग्र सुधारणा व्हावी, तसेच कृषि विद्यापीठांतर्गत जमीनीवरच मोठे क्रिडा संकुल उभारावे, दर्गा परिसराच्या विकास आराखड्यास मुहूर्त लागावे यासाठी आपण प्रयत्नांची पराकाष्टा करु, असे नमूद करतेवेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी परभणीकरांनी महापालिकेत राष्ट्रवादीच्या हाती सत्ता सुपूर्त करावी, आपण परभणी दत्तक घेऊ आणि विकासाचा मार्ग मोकळा करु, असा शब्द दिला.दरम्यान, या सभेस मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.

अन् आता कार्यकर्त्यांचे वाढदिवस साजरे होऊ लागले !

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका दारात आल्या आणि ग्रामीण राजकारणातला सूरच एका क्षणात बदलला. अनेक वर्षे न्यायालयीन व आरक्षणाच्या गुंत्यात अडकलेल्या या निवडणुका आता होणार हे स्पष्ट होताच जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदारसंघांत नेतेमंडळी आणि इच्छुक उमेदवारांची लगबग प्रचंड वाढली आहे. मागील काही वर्षांत ज्या कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष झाले होते, त्यांच्याच घरी आता नेत्यांची रांग लागल्याचे चित्र ग्रामीण भागात ठिकठिकाणी दिसत आहे. मागील अनेक वर्षांपासून जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका लांबणीवर गेल्याने ग्रामीण भागातील राजकीय हालचाली मंदावल्या होत्या. पक्ष संघटनांची बैठकीपुरती चळवळ मर्यादित राहिली होती; कार्यकर्त्यांशी प्रत्यक्ष संवाद कमी झाला होता. सत्ता नसल्याने व निवडणुकीची निश्चितता नसल्याने अनेक बड्या नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांकडे केवळ ‘कोअर गट’पुरते लक्ष केंद्रीत केले होते, तर तळागाळातील असंख्य कार्यकर्ते केवळ नावापुरते पक्षात राहिले होते.

 

याच काळात अनेक कार्यकर्त्यांना आपल्या तालुका किंवा जिल्हास्तरीय नेत्याला भेटण्यासाठी तासन्‌तास पक्ष कार्यालयाबाहेर किंवा कार्यक्रमस्थळी थांबावे लागत असे. रांगेत उभ्या असलेल्या या कार्यकर्त्याकडे पाहून ‘भेटू या पुढच्या वेळी’ असे सांगून नेते पुढे निघून जात, ही तक्रार गावागावांतून सातत्याने व्यक्त होत होती. पक्षावरील निष्ठा जपणाऱ्या या कार्यकर्त्यांना केवळ सभांमधील टाळ्या आणि मिरवणुकीपुरतेच महत्त्व उरल्याची खंत अनेकांनी खासगीत व्यक्त केली होती. मात्र कार्यकर्त्यांची ही प्रतीक्षा बहुतेक वेळा व्यर्थ ठरत होती. त्यांच्या नेत्यांकडून या कार्यकर्त्यांना प्रत्यक्ष भेटीसाठी वेळ मिळतच नसे. फोनवर साधा संदेश देण्यासाठीही महिनोन्‌महिने वाट पाहण्याची वेळ अनेक कार्यकर्त्यांवर येत होती. पक्षाचे झेंडे वाहणे, सभा भरवणे, मतदारांना आणणे या कामांत दिवस-रात्र घालवणाऱ्या या कार्यकर्त्यांना नेत्यांच्या ‘कार्यक्रमाच्या व्यस्ततेचा’ हा फटका बसत होता. नेत्यांचे वाढदिवस, सत्कार, गौरव सोहळ्यांमध्ये हेच कार्यकर्ते गर्दी करत असले तरी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील कोणताही आनंद सोहळा राजकीय पातळीवर कधीच दखल घेण्याजोगा मानला गेला नाही, अशी भावना त्यांच्या मनात घट्ट बसू लागली होती.

 

परंतु आता जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची लगबग सुरू होताच या वातारणात आमूलाग्र बदल दिसू लागला आहे. निवडणुकीचे अंदाज, मतदारसंघांचे समीकरण, आरक्षणाचा आराखडा, पक्षांतर्गत स्पर्धा – या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक कार्यकर्त्याचे राजकीय महत्त्व अचानकपणे वाढले आहे. आजवर ‘वेळ नाही’ म्हणून भेट नाकारले जाणारे तेच कार्यकर्ते आता नेत्यांच्या जवळ बसवले जात आहेत; त्यांचा सल्ला विचारला जात आहे; गावपातळीवरील त्यांचे मत निर्णायक मानले जात आहे.नेत्यांकडून कार्यकर्त्यांना आता केवळ भेटीसाठी वेळ दिला जात नाही, तर वैयक्तिक नात्यांची जाणीव ठेवत त्यांचा सन्मान करण्याची नवी स्पर्धा सुरू झाली आहे. काही ठिकाणी तालुका पातळीवर ‘कार्यकर्त्यांचा सन्मान सोहळा’ या नावाखाली मोठ्या मेजवान्या होत आहेत. गावोगाव ‘आपले कार्यकर्ते, आपली ताकद’ अशा घोषणांसह फोटोसेशन रंगू लागले आहे. पक्षनिष्ठा घट्ट ठेवण्यासाठी आणि नाराज कार्यकर्त्यांना पुन्हा सक्रिय करण्यासाठी नेतेमंडळी आता थेट त्यांच्या घरी पोहोचू लागल्याचे चित्र ठिकठिकाणी दिसत आहे.

 

सर्वात वेधक बदल वाढदिवस संस्कृतीत दिसतो आहे. ज्या कार्यकर्त्याला आपल्या नेत्याला भेटण्यासाठी तासन्‌तास वाट पाहावी लागत होती, त्याच कार्यकर्त्याच्या वाढदिवसाचा आता मोठा राजकीय सोहळा केला जाऊ लागला आहे. नेते स्वतः त्याच्या घरी जाऊन केक कापत आहेत, फेटा बांधत आहेत, पुष्पगुच्छ देत आहेत. काही ठिकाणी सोशल मीडियावर ‘अमुक-तमुक कार्यकर्त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा’ असे खास डिझाईन केलेले पोस्टर व्हायरल केली जात आहेत. याआधी ज्या कार्यकर्त्याला पक्ष कार्यालयात नेत्याच्या दाराशी तासन्‌तास थांबूनही भेट मिळत नसे, त्याच कार्यकर्त्यासाठी आता जीपमधून नेतेमंडळी गावात दाखल होतात; व्यासपीठावर त्याला सन्मानाने बसवले जाते; त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कार्यक्रम भरवले जातात. कार्यकर्त्याचे फोटो लावून बॅनर, पोस्टर, शुभेच्छा फलक गावात उभारले जात आहेत. काही गावांमध्ये तर असे वाढदिवस कार्यक्रम झाल्यानंतर लगेचच त्या कार्यकर्त्याचे स्थानिक पातळीवरील ‘समन्वयक’, ‘उपाध्यक्ष’ अशा पदांवर नियुक्तीचे पत्र देण्यात येत असल्याचेही दिसते.

राजकीय निरीक्षकांच्या मते, हा संपूर्ण बदल केवळ निवडणूक समीकरणांचा भाग आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये मतदारसंघ तुलनेने लहान असल्याने प्रत्येक गावातील मोजके प्रभावी कार्यकर्ते नेत्यांसाठी निर्णायक ठरतात. मतदारांना मतदानाच्या दिवशी बूथवर आणण्यापासून ते विरोधकांविरुद्ध वातावरण तयार करण्यापर्यंतची जबाबदारी या कार्यकर्त्यांवरच असते. त्यामुळे निवडणूक जवळ आली की याच कार्यकर्त्यांना ‘विशेष मान’ देण्याची परंपरा अधिक तीव्र रूपाने पुढे येते, असे जाणकार सांगतात. कार्यकर्त्यांच्या दृष्टीनं मात्र हा काळ मिश्र भावना निर्माण करणारा आहे. एका बाजूला नेत्यांकडून वाढलेले प्रेम, सत्कार, वाढदिवस साजरे होणे, घरपोच भेटी या सर्व गोष्टी त्यांना आनंद देतात; दीर्घकाळानंतर आपले महत्त्व ओळखले जात असल्याची जाणीव होते. तर दुसऱ्या बाजूला, अनेक कार्यकर्त्यांच्या मनात प्रश्न उपस्थित होतो – ही आपुलकी केवळ निवडणुकीपुरतीच की खरोखर बदल झालाय? निवडणुका संपल्यानंतर पुन्हा तेच जुने दिवस, तोच दारातला थांबा, तीच ‘वेळ नाही’ ही कारणे समोर येणार की या वेळचा अनुभव काहीसा वेगळा असेल?

 

ग्रामीण राजकारणात कार्यकर्त्यांची वाढती केंद्रस्थानी भूमिका आणि निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेली ही वाढदिवस संस्कृती अनेक प्रश्नही निर्माण करते. राजकीय पक्षांनी तळागाळातील कार्यकर्त्यांशी असणारे हे नाते केवळ मतांच्या गणितापुरते मर्यादित न ठेवता वर्षभर समान सन्मानाने टिकवले, तरच या वाढदिवस सोहळ्यांना खरी अर्थपूर्णता प्राप्त होईल, अशी प्रतिक्रिया अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि निवडणूक अभ्यासक देताना दिसत आहेत.

लेखक/शब्दरचना

लक्ष्मण उजगरे-मुख्यसंपादक

मर्डसगाव येथे केनिच्या सहाय्याने अवैध वाळु उपसा सुरू पथके अवैध वाळू वाहतूक उपसा बंद करण्यासाठी-की वसुलीसाठी

 

मर्डसगाव येथे केनिच्या सहाय्याने सुरू असलेल्या अवैध वाळू उपश्याने पाथरी महसूल प्रशासनावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. पथके स्थापन करूनही कारवाईऐवजी थेट रोख रकमेची वसुली होत असल्याच्या चर्चेमुळे जिल्हाधिकारींच्या आदेशांची प्रभावी अंमलबजावणी होत आहे का, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.

पाथरी(प्रतिनिधी)पाथरी तालुका हा अवैध वाळू उपसासाठी परभणी जिल्ह्यात नेहमीच अव्वल स्थानी असल्याचे स्थानिक पातळीवर मानले जाते. नदीपात्रातील वाळू तस्करी, रात्रीच्या वेळी होणारी वाहतूक आणि स्थानिक पातळीवरील कथित संगनमत यामुळे या तालुक्याची राज्यभर बदनामी होत आहे.पर्यावरणीय संतुलन बिघडवणारा आणि शासनाला कोट्यवधींचा महसूल तोटा करणारा हा अवैध वाळू व्यापार आवरता येत नसल्याची जनतेत भावना आहे.

याच पार्श्वभूमीवर पाथरी तालुक्यातील मर्डसगाव येथे सध्या चार केनींच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.नदीपात्रात यांत्रिक पद्धतीने चालू असलेले हे खोदकाम पाहता,महसूल विभाग आणि स्थानिक प्रशासनाला या हालचालींचा पत्ता नसणे अशक्य असल्याचे ग्रामस्थ सांगतात. त्यामुळे पाथरी महसूल प्रशासनाची भूमिका नेमकी काय,हा मूलभूत प्रश्न उभा राहिला आहे.राज्यातील अवैध वाळू उपशावर नियंत्रण आणण्यासाठी सरकारने महसूल विभागाला स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत,तसेच उच्च न्यायालयानेही या संदर्भात कठोर भूमिकेचे आदेश दिलेले आहेत.त्याच धर्तीवर परभणी जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या आदेशानुसार पाथरी महसूल विभागाकडून विशेष पथके स्थापन करण्यात आली आहेत.या पथकांचे उद्दिष्ट अवैध वाळू उपसा आणि वाहतूक रोखणे,दोषींवर दंडात्मक कारवाई करणे आणि शासनाचा महसूल वाचवणे असे सांगितले जाते.

परंतु प्रत्यक्षात ही पथके अवैध वाळू उपसा व वाहतूक रोखण्यासाठी आहेत की केवळ वसुलीसाठी काम करतात,असा गंभीर आरोप स्थानिक स्तरावर होऊ लागला आहे.पथके येण्याच्या बातमीने काही काळ गलबलाट निर्माण होतो,काही वाहने तात्पुरती थांबतात;मात्र काही तासांत पुन्हा जुन्याच गतीने वाळू उपसा आणि वाहतूक सुरू होत असल्याचे चित्र असल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत. त्यामुळे पथके ही फक्त दिखावा, तर माफियांकडून ‘टोल’ वसुली हा खरा उद्देश का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.स्थानिक सूत्रांच्या माहितीनुसार, मागील दोन दिवसांत पाथरी महसूल पथक मर्डसगाव परिसरात पोहोचले असता, सुमारे दोन किलोमीटर अंतरापर्यंत ट्रॅक्टरची रांग दिसून आली. हे ट्रॅक्टर वाळूने भरून ने-आण करत असल्याचे स्पष्टपणे दिसूनही, कठोर दंडात्मक कारवाई करण्याऐवजी महसूल अधिकाऱ्यांनी वेगळाच मार्ग अवलंबल्याची चर्चा रंगली आहे.

असे सांगितले जाते की,संबंधित पथक मर्डसगाव येथे गेले असताना,अवैध वाळू वाहतूक करताना आढळलेल्या प्रत्येक केनिला जोडलेल्या ट्रॅक्टरमालकांकडून साठ हजार रुपये असा कथित सौदा करण्यात आला.या दोन्ही केनिसाठी मिळून सुमारे एक लाख वीस हजार रुपये रोख स्वरूपात उचलल्याची चर्चा सध्या पाथरी तालुक्यात जोरात सुरू आहे. प्रत्यक्ष पंचनामे, जप्ती, गुन्हे नोंदविणे किंवा शासनाने निश्चित केलेल्या दंडाच्या तरतुदींची अंमलबजावणी न होता, जागीच तडजोड करून ‘समेट’ केल्याचा आरोप ग्रामस्थांच्या चर्चांमधून पुढे येत आहे.राज्यातील अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी महसूल व पोलीस विभागाच्या संयुक्त कारवाईची आवश्यकता शासनाने अधोरेखित केली आहे. काही जिल्ह्यांत अशा संयुक्त मोहिमांतून ट्रॅक्टर, डंपर, यंत्रसामग्री जप्त करून मोठ्या प्रमाणावर दंड वसूल केल्याच्या घटना घडल्या आहेत. परंतु पाथरी तालुक्यात मात्र कारवाईपेक्षा संगनमत आणि ‘सेटिंग’ची भाषा अधिक ऐकू येत असल्याने,येथे शासन धोरणांची प्रत्यक्ष अंमलबजावणी कितपत होते, असा सवाल उपस्थित झाला आहे.

 

महसूल विभाग बोजा का टाकत नाही? स्थानिकांमध्ये जोरदार चर्चा

या पार्श्वभूमीवर “ज्या शेतातून इतक्या मोठ्या प्रमाणावर वाळूची वाहतूक होते, त्या शेतावर महसूल विभागाकडून बोजा का टाकण्यात येत नाही?” हा प्रश्न स्थानिक पातळीवर जोरदार चर्चेचा विषय ठरला आहे. साधारणपणे शेतजमिनीवर शासकीय कामांसाठी रस्ता, कालवा, वीजलाईन इत्यादींसाठी वापर झाल्यास किंवा जमिनीचा वापर बदलल्यास, महसूल नोंदवहीत त्यानुसार नोंद घेऊन जमिनीवर ‘बोजा’ (तुट, सुधारित नोंद, कर आकारणी इ.) लावण्याची पद्धत आहे. पण येथे शेतरस्त्यांचा दररोजच्या व्यापारी वाहतुकीसाठी – तेही मोठ्या प्रमाणावर – वापर होत असताना संबंधित विभाग मूक दर्शक राहिला आहे, अशी टीका होत आहे

बुद्धधम्म विश्वाला एकसंघ ठेवणारा – पूज्य भदंत थेपवन्नीसुंथरम

बुद्धधम्म विश्वाला एकसंघ ठेवणारा – पूज्य भदंत थेपवन्नीसुंथरम

परभणी(प्रतिनिधी)भारत भूमीमध्ये अडीच हजार वर्षांपूर्वी तथागत बुद्धांचा जन्म झाला. त्यामुळे भारतभूमी ही संपूर्ण विश्वात पवित्रस्थान मानली जाते, संपुूर्ण जग हे बुद्धांमुळे भारताला वंदन करते. भारत बुद्धांमुळे विश्वगुरू मानला जातो. बुद्धाचा धम्म आधुनिक युगाला तारणारा, एकसंघ ठेवणारा आहे, असे प्रतिपादन थायलंड येथील पूज्य भंते थेपवन्नीसुंथरम यांनी केले. ते तालुक्यातील मांडाखळी-उमरी येथे आयोजित आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषदेत गुरूवारी(दि. ८)बोलत होते.

आश्रय सेवाभावी संस्था व गगन मलिक फाउंडेशनच्या वतीने जागतिक धम्मध्वज दिनानिमित्त डॉ. सिद्धार्थ हत्तीअंबिरे त्यांच्या पुढाकारातून पहिल्या धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले. परिषदेचे उद्घाटन पूज्य भंते थेपवन्नीसुंथरम (थायलंड) यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी भदंत डॉ. आग्रहेरा कश्यप थेरो (श्रीलंका), भदंत काँग धम्मलोक (व्हिएतनाम), भंते शरणानंद महास्थविर, भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो, भदंत प्रा. डॉ. खेमधम्मो महाथेरो, भदंत डॉ. इंदवंश महाथेरो, भदंत डॉ. धम्मदीप महाथेरो, भंते पय्यानंद थेरो, भदंत मोगलायन आदींसह देश – विदेशातील भिक्खू संघाची उपस्थिती होती. प्रमुख अतिथी म्हणून काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष राजेंद्रपाल गौतम, सिनेअभिनेते गगन मलिक, आमदार डॉ. राहुल पाटील, आमदार राजेश विटेकर, काँग्रेस जिल्हाधक्ष बाबाजानी दुर्राणी, श्रीलंका येथील धम्मउपासिका कौशल्य विक्रम शिंदे, थायलंड येथील अभिनेत्री मिस पावीरीसा, मिस अलिसा (ऑस्ट्रेलिया), मिस उमाफोन (थायलंड), कॅप्टन डॉ. नटकटी, पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी, प्रा. डॉ. भीमराव खाडे, डॉ. बी. टी. धुतमल उपस्थित होते. परिषदेच्या सुरुवातीस धम्मध्वजाचे ध्वजारोहण भिक्खू संघाच्या हस्ते करण्यात आले. यानंतर उपस्थित उपासक – उपासिकांनी पुष्पवृष्टी करून भिक्खू संघाचे स्वागत केले. दरम्यान तथागत भगवान बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण करण्यात आले. उपस्थित मान्यवर व भिक्खू संघाच्या हस्ते दीपप्रज्वलन करून परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर भिक्खू संघाने उपस्थितांना त्रिशरण, पंचशील दिले. आयोजक डॉ. सिद्धार्थ हत्तीअंबीरे यांच्या वतीने भिक्खू संघाला चिवरदान करून स्वागत करण्यात आले.

प्रास्ताविकात डॉ. हत्तीअंबिरे म्हणाले की, लवकरच येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे बुद्धविहार उभे केले जाणार आहे, जागतिक धम्मध्वज दिनानिमित्त ही आंतरराष्ट्रीय धम्म परिषद घेण्याचा संकल्प मी केला होता. तो आज पुर्ण होत आहे. बौद्ध धम्माचा अनुयायांनी आपल्या कृती व आचरणातून आदर्श घालून द्यावा, समाज विकासासाठी धम्मविचार प्रत्येकामध्ये रुजवणे गरजेचे आहे. या परिषदेच्या माध्यमातून भारत हा बौद्धमय करण्याच्या दिशेने वाटचाल होत आहे. दरवर्षी ८ जानेवारीला आंतरराष्ट्रीय बौद्धधम्म परिषद आयोजित केली जाईल, असे सांगितले.

यावेळी भिक्खू संघाची धम्मदेशना संपन्न झाली. या परिषदेस बौद्ध उपासक – उपासिकांची हजारोंच्या संख्येने उपस्थिती होती. परिषदेचे सूत्रसंचालन डॉ. सुनिल तुरुकमाने यांनी केले. आभार राहुल वाहिवळ यांनी मानले. (छाया – शैलेश डहाळे)

रस्ता सुरक्षा अभियानाचा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते शुभारंभ नियम पाळा…जीव वाचवा…! सुरक्षित परभणीचा संकल्प..!

रस्ता सुरक्षा अभियानाचा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते शुभारंभ
नियम पाळा…जीव वाचवा…! सुरक्षित परभणीचा संकल्प..!

परभणी, दि. 07 (प्रतिनिधी) :रस्ते अपघातांमुळे होणारी जीवितहानी कमी करण्यासाठी व नागरिकांमध्ये रस्ता सुरक्षाविषयी जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाच्या निर्देशानुसार 31 जानेवारी 2026 पर्यंत राज्यभर राष्ट्रीय रस्ता सुरक्षा महिना साजरा करण्यात येत आहे. या अनुषंगाने परभणी जिल्ह्यात रस्ता सुरक्षा अभियान-2026 चा उद्घाटन सोहळा आज जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या हस्ते पार पडला.

जिल्हाधिकारी यांनी रस्ता सुरक्षा अभियान यशस्वी ठरण्यासाठी अपघातांचे प्रमाण कमी होणे हेच खरे फलित असल्याचे सांगितले. वाहन चालविताना मोबाईलचा वापर टाळणे, नियमांचे काटेकोर पालन करणे, अनावश्यक हॉर्न न वाजवणे तसेच शाळा-महाविद्यालय परिसरात विशेष दक्षता घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. अवैध वाळू वाहतूक, क्षमतेपेक्षा अधिक मालवाहतूक करणाऱ्या जड वाहनांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. “सुरक्षित परभणी निर्माण करूया” असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या कार्यक्रमास पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत कोरे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी आशिष पाराशर तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी तसेच शालेय विद्यार्थी उपस्थित होते.

पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी रस्ता सुरक्षा संस्कृती रुजविण्याची गरज व्यक्त केली. दुचाकीस्वारांचे अपघाताचे प्रमाण अधिक असल्याने हेल्मेटचा वापर अनिवार्य असून, हेल्मेटमुळे अनेकांचे प्राण वाचू शकतात, असे त्यांनी स्पष्ट केले.

प्रास्ताविक उप प्रादेशिक परिवहन अधिकारी आशिष पाराशर यांनी केले. जानेवारी महिन्यात संपूर्ण देशभर रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येणार असून, यामध्ये जनजागृती कार्यक्रम, शिबिरे, कार्यशाळा तसेच अपघातप्रवण ठिकाणांची ओळख करून उपाययोजना करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापरही करण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

या अभियानांतर्गत परिवहन विभाग व वाहतूक पोलीस विभागाच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षिततेसाठी प्रचार, जनजागृती व जनप्रबोधनात्मक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. नागरिक, वाहनचालक, विद्यार्थी व सर्व संबंधित घटकांमध्ये रस्ता सुरक्षेबाबत जागरूकता वाढविणे हा मुख्य उद्देश आहे.

उद्घाटन सोहळ्यावेळी रस्ता सुरक्षा मार्गदर्शिका, स्कूल बस मार्गदर्शिका, जीवनदूत मार्गदर्शिका यांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. तसेच रस्ता सुरक्षेबाबत उपस्थितांना शपथ देण्यात आली. यावर्षीच्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा महिन्याची संकल्पना “सडक सुरक्षा – जीवन रक्षा” अशी असून, रस्ता सुरक्षा ही प्रत्येकाच्या जीवनरक्षणाशी निगडित आहे, हा संदेश सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यावर भर देण्यात येणार असल्याचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी आशिष पाराशर यांनी सांगितले. जिल्हाधिकारी श्री. चव्हाण यांच्या हस्ते रडार यंत्रणा बसवलेले इंटरसेप्टर वाहनाचा हिरवी झेंडी दाखवून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात शुभारंभ देखील करण्यात आला.

संत रविदास महाराज जयंती उत्सव कमिटीच्या अध्यक्षपदी आहीलोबा ठोंबरे तर सचिव पदी अशोक शिंदे यांची निवड

संत रविदास महाराज जयंती उत्सव कमिटीच्या अध्यक्षपदी आहीलोबा ठोंबरे तर सचिव पदी अशोक शिंदे यांची निवड

 

 

पाथरी(प्रतिनिधी)राष्ट्रीय चर्मकार महासंघ शाखा पाथरी येथे संत रविदास महाराज यांच्या जयंती निमित्ताने आज विश्राम गृह येथे पार पडली. कार्यक्रमाचे अध्यक्ष माणिकराव सवणे, प्रमुख मार्गदर्शक सोपानरावजी बनसोडे साहेब, प्रमुख उपस्थिती RCM जिल्हा उपाध्यक्ष नारायण सावळे, तालुका अध्यक्ष किरण फुलपगार, यांच्या उपस्थितीत जयंती कमिटी अध्यक्ष पदी आहीलोबा ठोंबरे साहेब यांची निवड झाली,

उपाध्यक्षपदी जळबाजी कावळे, सचिव पदी अशोक भाऊ शिंदे, स्वागत अध्यक्ष अर्जुन केंदळे, कोषाध्यक्ष गुलाब भाऊ पंढरे, सहकोषाध्यक्ष गणेश कांबळे तसेच रगनाथ कांबळे माजी जिल्हा परिषद सभापती दत्ताराव नागमोडे तसेच सदस्य शिवाजी सोनटक्के, सागर भाऊ तिखे, किशन केंदळे, नारायण शिंदे, अंकुश केंदळे,अजिंक्य देवकुळे, अमोल रणसुर, दिनेश पांढरे, बाळू दळवे, किशोर दळवे, नामदेव पाटील, गोपाळ मस्के, गोविंद कांबळे, विष्णू वाघमारे, गंगाधर कावळे, बाबा कावळे, प्रकाश कावळे, रामा जाधव, सोपान जाधव, कृष्णा केंदळे, सुरज केंदळे, सौरभ सवणे, सचिन केंदळे, संतोष केंदळे, अशोक केंदळे, अशोक शिंदे, करण सोनटक्के, बालाजी बामणे, शिवा केंदळे, सुधाकर ठोंबरे, नामदेव बनसोडे, राजेभाऊ वनकळसे सर्व राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.