Home देश-विदेश उच्चविद्याविभूषित डॉ. बाबासाहेब आंबेडकर

उच्चविद्याविभूषित डॉ. बाबासाहेब आंबेडकर

उच्चविद्याविभूषित डॉ. बाबासाहेब आंबेडकर

मानवाच्या प्रगतीच माध्यम शिक्षण आहे.शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही.त्यामुळे शिक्षण हे माणसाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक आहे. कसल्याही परिस्थितीत शिक्षण घेतले पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिक्षणाला वाघीणीचे दूध म्हणतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाच्या जोरावर भारताचा पाया रचला. शिक्षणाचे महत्त्व डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांनी संपादन केलेल्या डिगऱ्या पाहिल्यावर लक्षात येते. त्यांची विद्वत्ता यातून दिसून येते. जागतिक किर्तीचा तत्ववेत्ता म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा गौरव होतो .हा भारताचा सन्मान म्हणावा.

जगातील उच्च शिक्षण संस्थेत त्यांचा आदर्श आणि त्यांचा अभ्यास विद्यार्थी करतात.त्यांची विकासाची दूरदृष्टी अनेक देशांत अभ्यासली जाते.डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे परदेशातून अर्थशास्त्रामध्ये डॉक्टरेट (पीएच.डी.) पदवी मिळवणारे पहिले भारतीय आहेत. तसेच ते दक्षिण आशियातून दोनदा डॉक्टरेट (पीएच.डी. व डी. एससी.) पदव्या मिळवणारे पहिले दक्षिण आशियाई .त्यांनी नोव्हेंबर, १८९६ ते नोव्हेंबर १९२३ अशा २७ वर्षांत मुंबई विद्यापीठ, कोलंबिया विद्यापीठ, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि ग्रेस इन या शिक्षण संस्थांमधून उच्च शिक्षण घेतले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या दरम्यान बी.ए., दोनदा एम.ए., पी.एचडी., एम.एस्सी., बार-ॲट- लॉ आणि डी.एस्सी. या पदव्या मिळवल्या. १९५० च्या दशकात त्यांना एलएल.डी. आणि डी.लिट. या दोन सन्माननीय पदव्या सुद्धा प्रदान करण्यात आल्या. आंबेडकर हे भारतातील सर्वात प्रतिभाशाली व सर्वाधिक उच्च विद्याविभूषित व्यक्ती होते.

उस्मानिया विद्यापीठ हे भारतातील तेलंगणा राज्यातील हैदराबाद येथे एक सार्वजनिक राज्य विद्यापीठ आहे.हैदराबादचे ७ वे निजाम मीर उस्मान अली खान यांनी २९ ऑगस्ट १९१७ रोजी त्याच्या निर्मिती केली. हे दक्षिण भारतातील तिसरे सर्वात जुने विद्यापीठ आणि पूर्वीच्या हैदराबाद राज्यात स्थापन झालेले पहिले विद्यापीठ आहे.२०२३ च्या क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगनुसार उस्मानिया विद्यापीठ जगात १२०१-१४०० आणि आशियातील विद्यापीठांमध्ये ४०१-४५० क्रमांकावर आहे. द टाइम्स हायर एज्युकेशन वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगने २०२३ च्या रँकिंगमध्ये जागतिक स्तरावर १२०१-१५०० स्थान दिले आहे . २०२२ मध्ये आशियामध्ये ३०१-३५० आणि इमर्जिंग इकॉनॉमीज युनिव्हर्सिटी रँकिंग २०२१ मध्ये ३०१-३५० क्रमांक आहे.भारतात, राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंग फ्रेमवर्कने २०२४ मध्ये उस्मानिया विद्यापीठाला भारतीय विद्यापीठांमध्ये ४३ वे आणि एकूण ७० वे स्थान दिले आहे. या उस्मानिया विद्यापीठाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आजच्या दिवशी म्हणजे १२ जानेवारी १९५३ रोजी डॉक्टर ऑफ लिटरेचर (डी.लिट.) ही मानद पदवी प्रदान केली होती, ज्यात त्यांच्या महान कार्याचा, बुद्धिमत्तेचा आणि समाजासाठी केलेल्या योगदानाचा गौरव करण्यात आला आहे . त्यांनी केलेल्या सामाजिक आणि तत्कालीन अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी जीवनभर वर्षे संघर्ष केला . जगातील सर्वात मोठे भारतीय संविधान लिहिले. त्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याचा सन्मान म्हणून त्यांना डि.लिट.पदवी दिली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाच्या जोरावर अनेक पदव्या मिळाल्या.डॉक्टर ऑफ लॉ ही सन्माननीय पदवी ५ जून १९५२ रोजी अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठाने प्रदान केली. ‘भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, मंत्रिमंडळाचे सदस्य आणि राज्यसभेचे सदस्य, भारताच्या प्रमुख नागरिकांपैकी एक, एक महान समाजसुधारक आणि मानवी हक्कांचा शूर समर्थक’ असे कोलंबिया विद्यापीठाने त्यांना दिलेल्या मानपत्रात संबोधण्यात आले आहे. डॉक्टर ऑफ लिटरेचर (डी.लिट.) ही सन्माननीय पदवी १२ जानेवारी १९५३ रोजी तेलंगाणा राज्यातील हैदराबादमधील उस्मानिया विद्यापीठाने प्रदान केली. भारतीय बौद्ध विशेषतः आंबेडकरी अनुयायी आंबेडकरांना ‘बोधिसत्त्व’ व ‘मैत्रेय’ मानतात. इ.स. १९५५ मध्ये, काठमांडू, नेपाळ येथे झालेल्या जागतिक बौद्ध परिषदेत सहभागी बौद्ध भिक्खूंनी त्यांना ‘बोधिसत्व’ ही उपाधी प्रदान केली. त्यानंतर दलाई लामा एकदा डॉ. आंबेडकरांना भेटले असता दलाई लामांनी सुद्धा त्यांना ‘बोधिसत्व’ संबोधले होते. आंबेडकर यांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या शिक्षण संस्थांमधून अर्थशास्त्र विषयात पीएच.डी. पदव्या मिळविल्या; तसेच त्यांनी कायदा, अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयांवर संशोधन केले. त्यांच्या सुरुवातीच्या कारकिर्दीत, ते एक अर्थशास्त्रज्ञ, प्राध्यापक आणि वकील होते. त्यानंतर त्यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रांत काम केले. ते भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्रचारामध्ये व चर्चांमध्ये सामील झाले, वृत्तपत्रे प्रकाशित केली, दलितांसाठी राजकीय हक्कांचा व सामाजिक स्वातंत्र्याचा पुरस्कार केला, तसेच आधुनिक भारताच्या निर्मितीत मोलाचे योगदान दिले. विकसित भारताचा पाया संविधानात शिल्पित केला आहे. त्या संविधान निर्मात्याला उस्मानिया विद्यापीठातून १९५३ साली डिलीट पदवी देण्यात आली. आज त्याला ७३ वर्षे पूर्ण होतील.अशा मानद पदव्या आंबेडकरी अनुयायी संपादन करतील आणि विद्यापीठ स्तरावर सुध्दा अशाच विद्वानांचा पदवी देऊन सन्मान केला जाईल, या अपेक्षेसह केलेला शब्द प्रपंच.

– पदमाकर उखळीकर ,

(लेखक मुक्त पत्रकार आहेत.)

मो.९९७५१८८९१२.

kalpadmakarukhlikar@gmail.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here