परभणी दि. 09 (प्रतिनिधी) : कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) मार्फत जिल्ह्यातील शेती क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांची निवड करून त्यांना जिल्हास्तरीय शेतकरी पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
जिल्हास्तरावर एकूण ५ शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार असून त्यामध्ये खुला प्रवर्ग २ शेतकरी, महिला १ शेतकरी, अनुसूचित जाती / जमाती २ शेतकरी अशा प्रकारे एकूण पाच शेतकऱ्यांना पुरस्कार वितरित करण्यात येणार आहेत.
शेतकऱ्यांची निवड ही त्यांनी अवलंबलेल्या विविध पीक पद्धती, नाविन्यपूर्ण शेती तंत्रज्ञान व उत्पादनक्षमतेच्या आधारे करण्यात येणार आहे. ज्या शेतकऱ्यांना जिल्हास्तरीय पुरस्कारापेक्षा वरिष्ठ असलेले राज्यस्तरीय पुरस्कार यापूर्वी प्राप्त झाले आहेत, असे शेतकरी या पुरस्कारासाठी पात्र राहणार नाहीत. तरी पात्र व इच्छुक शेतकऱ्यांनी दि. १६ जानेवारी २०२६ पर्यंत आपले अर्ज प्रकल्प संचालक, आत्मा कार्यालय येथे सादर करावेत. अर्जाचा विहित नमुना संबंधित कार्यालयात उपलब्ध आहे. असे आवाहन प्रकल्प संचालक, आत्मा श्री. दौलत सु. चव्हाण यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
