Home देश-विदेश हेच संस्कार पुढच्या पिढीत येतील?

हेच संस्कार पुढच्या पिढीत येतील?

हेच संस्कार पुढच्या पिढीत येतील?

एकमेकांचा आदर राखण्याची संस्कृती जवळजवळ लोक पावली म्हटले तरी वावगे ठरणार नाही .अगदी वाढत्या शहरीकरणामुळे आणि मॉडर्न जगाच्या पाठीमागे असलेला माणूस हळूहळू संस्कृतीशी फारकत घेताना दिसत आहे . त्यामुळे वर्तमानात जिथे कुठे संस्कृती टिकून आहे ती भविष्यात किती टिकेल हा प्रश्न , उभा असताना आत्ताच संस्कृती कुठेतरी नष्ट होताना दिसत आहे .याचे कारण म्हणजे गुरुजनांचा किंवा वडिलांचा आदर किंबहुना मोठ्या व्यक्तींचा सन्मान राखण्याची संस्कृती किंवा संस्कार ज्यांना मिळाले आहेत त्यांनी ते अजूनही टिकून ठेवले आहेत . परंतु , संस्कार आपल्यात निर्माणही केले पाहिजेत . गुरुजनांचा सन्मान राखणं किती राहिले आहे. याउलट थोरा मोठ्यांचा सन्मान राखण्याऐवजी त्यांची अवहेलना केली जाते .किंबहुना त्यांच्याशीच मैत्री करून कुठलेही वयाचे अंतर लक्षात न घेता वागले जाते . दिवसीय महिला क्रिकेट विश्वचषक जिंकल्यानंतर महिला क्रिकेट संघाच्या खेळाडूने प्रशिक्षकाचे पाय धरले .यावरून संस्कृती कुठेतरी टिकून आहे . किंबहुना संस्कार अजूनही आहेत हे दिसले. मात्र, हे संस्कार पुढच्या पिढीत किती राहतील कारण आत्ताची पिढी संस्काराशी फारकत घेत असताना पुढची पिढीमध्ये संस्कार ठेवेल काय? हा प्रश्न. संस्कार पिढ्यानपिढ्यापासून आलेली शिदोरी आहे, ती शिदोरी पुढच्या पिढीला आपण दिली तर संस्कार टिकतील आणि एक सजग समाज निर्माण होईल. एकमेकातील आदर ठेवला जाईल अन्यथा संस्कार हे काय असतात हे विसरून जावं लागेल. कारण यंत्राच्या बरोबरीने वेग करण्यासाठी प्रयत्नशील असलेला माणूस हा यंत्र होऊन बसला आहे. तसं त्यानं यंत्रमानव हे नाव देऊन यंत्रमानव तयार केला आहेच. तर कृत्रिम बुद्धिमत्ता ही सुद्धा माणसाच्या विचाराप्रमाणे कृती करेल. पण, हळूहळू भावनाहीन बनत चाललेल्या मानवात आदरभाव कसा निर्माण होईल? हा प्रश्न. आपण आधीच्या पिढीचा विचार करू ज्यापूर्वी यंत्रमानव आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या शब्दाचा उगम व्हायचा होता. त्यावेळची पिढी आणि आजची कृत्रिम बुद्धिमत्तेत गुंतलेली पिढी यामध्ये आदरभाव कमी झाल्याचे आपल्या लक्षात येईल. जगाबरोबर आपल्याला वेग पकडावा लागेल यात दूमत नाही. पण, संस्कार हा भाग आपल्या जीवनात राहणार का? हा प्रश्न.आपण जगाच्या बरोबरीने वाटचाल करीत असू आणि केली तरच आपण जगाच्या विकासात टिकून राहू. पण संस्कार हे मानवाच्या दैनंदिन जगण्याचे आणि माणूस असल्याचे जीवंत आहे. अन्यथा आपल्यात आणि इतर प्राण्यांच्यामध्ये फरक तो काय? भारत हा केवळ देश नाही तर सर्वांत मोठी लोकशाही आणि संस्कृती संवर्धन आणि संस्कारच उत्तम उदाहरण आहे जगासाठी! आपली ओळख ही जगात वेगळी आहे ती यामुळेच. आपण कितिही मोठं झालो किंवा यश संपादन केले तरी आपला नम्रपणा हा यश आणि आपला विजय आहे. त्यामुळे संस्कारक्षम पिढी घडवणे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे आणि त्याची सुरुवात कुटुंबातून घरातून झाली पाहिजे. आपण, काय करावे, काय करू नये.याबाबत मुलांना कठोरपणे निर्बंध घालतो. मात्र, आदराने आणि नम्रपणे कसे वागले पाहिजे याबद्दल किती सांगतो हा विषय संशोधनाचा होईल.याचा परिणाम होतो तो म्हणजे पुढची पिढी वृद्ध आईवडिलांना सांभाळत नाही. त्यामुळे वृध्दाश्रमांची संख्या आपण वाढवत आहोत.हा संस्काराचा भाग आहे. दिवसेंदिवस माणूस एकलकोंडा आणि आत्मकेंद्री आणि संकुचित विचारांचा होतो आहे.हा संस्कृती आणि संस्काराचा भाग आहे. आजकालची मुलं – मुली आई -वडील किंवा कुटुंबातील मोठ्यांचे पाय धरून नम्र होतात का? कुटुंबाचा आदर किती राखतात?जर आजकालची तरुण पिढी कुटुंबात नम्र नसतील तर ती पोरं इतरांचा आदर किती राखत असतील? भारतीय महिला क्रिकेट संघाने २०२५ आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक जिंकून इतिहास रचला आहे.भारतीय महिला क्रिकेट संघाने पहिला विश्वचषक जिंकल्याची नोंद झाली आहे.या ऐतिहासिक विजयावेळी भारतीय महिला संघाचे मुख्य प्रशिक्षक अमोल मुजुमदार होते. त्यामुळे इतिहास हा याचीही आणि कर्णधार असलेल्या हरमनप्रीत कौर यांचीही नोंद इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिली जाईल. भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने आयसीसी महिला विश्वचषक २०२५ जिंकल्यानंतर मुख्य प्रशिक्षक अमोल मुजुमदार यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले. संस्कारचा हा क्षण जगाने पाहिला.हा क्षण २ नोव्हेंबर २०२५ रोजी नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर घडला, जेव्हा भारताने अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा ५२ धावांनी पराभव करून आपले पहिले-वहिले विश्वचषक विजेतेपद पटकावले. हा विजय भारतीयांना मिळवून देणाऱ्या संघाचे कौतुक करावे तितके थोडेच.
भारताची संस्कृती आणि संस्काराची ओळख झाली ती कर्णधार असलेल्या हरमनप्रीत कौर यांनी प्रक्षिक्षकाचे पाय धरून आशीर्वाद घेतल्याने.खर तर भारताची संस्कृती आणि संस्कार, सभ्यता, नम्रता वेळोवेळी दिसून येते.हे वेगळेपण इतर राष्ट्रांत किती आहे हा विषय वेगळा पण भारतीय संस्कृती आणि संस्कार विजयाच्या उत्साहातही आपण विसरत नाही, हा संदेश हरमनप्रीत कौर यांनी जगाला दाखवून दिला. भारत ही महापुरुषांची, संस्काराची भूमी आहे.हा संदेश जगाला दिला असला तरी आपण संस्कार विसतोय की, काय याचा विचार व्हावा हा या लेखामागील उद्देश .ऐवढेच .

– पदमाकर उखळीकर ,
(लेखक मुक्त पत्रकार आहेत.)
मो.९९७५१८८९१२.
kalpadmakarukhlikar@gmail.com.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here