Home देश-विदेश देशहितासाठी काँग्रेसने कधीच तडजोड केली नाही;प्रसंगी पक्षाला पणास लावले!

देशहितासाठी काँग्रेसने कधीच तडजोड केली नाही;प्रसंगी पक्षाला पणास लावले!

देशहितासाठी काँग्रेसने कधीच तडजोड केली नाही;प्रसंगी पक्षाला पणास लावले!

 

काँग्रेसच्या १४० वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये गेल्या दशकभरात काँग्रेसची झालेली पिछेहाट लक्षात घेता , काँग्रेसला नव्याने उभारी घेण्यासाठी समाजकारण किंवा राष्ट्रहिताच्या दृष्टीने महत्त्वाच्या निर्णयाबाबत थोडीशी फारकत घेण्यास भाग पडावे लागेल,भलेही ते शक्य नसले तरी.काँग्रेस पक्ष वाढविण्यासाठी १०० % राजकारण करण्यावर काँग्रेसने भर दिला पाहिजे असे एकंदरीत देशाच्या राजकारणाच्या कलाटणीमुळे वाटते. कारण, केवळ राजकारण न करता काँग्रेसने सत्तेत असताना आणि सध्या विरोधात असतानाही अनेक देशहिताच्या योजना आणि निर्णय घेतले. मात्र, या निर्णयाचे किंवा राष्ट्रहिताच्या योजनेचे काँग्रेसला राजकारण करता आले नाही, असे म्हटले तर योग्य होईल. कोणताही निर्णय सध्याच्या घडीला घेत असलेला सत्ताधारी भारतीय जनता पक्ष केवळ राजकारणाचा आणि सत्तेचा दृष्टिकोन समोर ठेवून निर्णय घेताना दिसतो आहे. याला कोणीही नाकारणार नाही. कारण, गेल्या दशकभरातील अनेक निर्णय सत्तेच राजकारण समोर ठेवून घेतल्याचे जाणवेल. राष्ट्रहिताच्या दृष्टीने समाजकारण करण्याचा अजेंडा आता कोणत्याही राजकीय पक्षाचा सध्यातरी दिसत नाही आणि हाच अजेंडा काँग्रेसच्या रक्तात नाही. हे काँग्रेसची आजच्या घडीला कमजोर बाजू म्हणता येईल.यापेक्षा काँग्रेसच्या रक्तात सत्तेचा वापर केवळ निवडणुकीच्या अनुषंगाने करावयाचा हे रक्तात नाही. सत्तेचा मार्ग हा राजकारणातून जात असला तरी लोकशाहीची लक्तरे करून सत्तेचा मार्ग शोधणे मुळीच संविधानाला अपेक्षित नाही. कारण लोकशाहीची व्याख्या लोकांच्या जीवनामध्ये रक्तहीन अमुलाग्र बदल झाला पाहिजे अशी आहे.असे असताना याउलट सत्तेचा वापर केवळ सत्तेसाठी कसा करता येईल , यासाठीची गोळा बेरीज करण्यात आणि कसे निर्णय घेण्यात आजचे सत्तेतील पक्ष तरबेज आहेत. राजकारणाची पुरती दिशा बदलली असून, राष्ट्रहिताचे निर्णय घेणे सध्याच्या राजकारणात बसत नाही म्हटले तरी वावगे ठरू नये. त्यासाठी काँग्रेसने निदान लोकशाहीच्या मूल्यांसाठी राजकारण करण्याच्या पद्धतीत बदल करणे आवश्यक आहे. लोकशाहीने दिलेला बंधुभाव- स्वातंत्र्य -समता ही मूल्ये जपायची असतील तर राजकारण करण्याच्या पद्धतीला थोडी काँग्रेसने कलाटणी दिली तर संविधानिक मूल्य जिवंत राहतील , अन्यथा संविधानिक मूल्य मरणासन्न अवस्थेत आहेत. गेल्या दशकभरातील राजकारण पाहता साम- दाम -दंड -भेद हे राजकारणाचे मुख्य अंग झाले आहे. विचारसरणी ,पक्षनिष्ठा, लोकशाही लोकमुल्य, तत्त्वनिष्ठपणा, मानसन्मान , आदर याला कुठेही थारा नाही. जनतेच्याही बौद्धिक पद्धतीत साम -दाम- दंड- भेद हीच मूल्य रुजवून, संविधानिक आणि लोकशाही मूल्य पुरती डोक्यातून काढण्यास भाग पाडले आहे. त्यामुळे काँग्रेसला सुद्धा काही काळ या पद्धतीचा वापर करता आला तर लोकशाहीतील संविधानिक मुल्य जपली जातील. मात्र त्यासाठी काँग्रेसला राजकारण करण्याच्या दिशेत बदल करावा लागेल. त्यातूनच परिवर्तन अटळ आहे. तसेच, देशातील सर्वच लोकशाहीवादी राजकीय विचारसरणीच्या पक्षांना सोबतीला घेऊन त्यांचा सन्मान ठेवून, एकत्र संविधानिक मूल्य तर वाचतील आणि काँग्रेसही पुन्हा उभारी ही घेईल. देशातील बहुतांश जनता संविधान मूल्य लोकशाही या तत्त्वांना बाजूला करून वैचारिक गुलाम झाली आहे. त्यासाठी देशातील भाजपच्या सहयोगी संघटना मदत करीत असतात. देशात वैचारिक गुलामगिरी लादली असून, यातून बाहेर पडण्यासाठी जनतेला स्वतः यापासून दूर ठेवता आले पाहिजे.

राजकारण सत्तेसाठी आणि सत्ता राजकारणासाठी असे समीकरण सध्याच्या राजकारणाचे झाले असून राष्ट्रहिताच्या निर्णयासाठी किंवा लोक कल्याणसाठी राजकारण आणि सत्तेचा वापर करण्याचे तत्व, धोरण आता दुरापास्त झाले आहे. पण यामुळे लोकशाहीला घरघर लागल्याशिवाय राहणार नाही याची जबाबदारी मतदारांसह लोकशाहीवादी राजकीय पक्षांची आहे .त्यासाठी काही काळ तोच मार्ग अवलंबावा लागला तरी चालेल. मात्र, लोकशाहीची होत असलेली घरघर वाचविण्यासाठी जनतेने आणि लोकशाही मूल्य जपणाऱ्या राजकीय पक्षांनी याचा विचार अगत्याने करणे आवश्यक आहे. त्याशिवाय गत्यंतर नाही. काँग्रेसचा देदीप्यमान राजकीय इतिहास आणि सत्तेतील राष्ट्र हिताची धोरणे यामुळे देश आणि नागरिक इथपर्यंत आला आहे . तसेच भारत देशाला वेगळी ओळख भारतीय संविधानामुळे निर्माण झाली आहे . केवळ बिल्डिंग आणि रस्ते बांधून विकसित भारत होत असेल तर नागरिकांचे संविधानिक हक्क तुडवून विकसित भारत होत असेल तर हा भारत पुन्हा गुलामगिरीत जाईल आणि गरीब श्रीमंत यांच्यातील दरी वाढून, श्रीमंत गरिबांचे शोषण करून त्यांना गुलाम बनवतील .यासाठी काँग्रेससह देशातील जनतेने बळकट होणे आवश्यक आहे. भाजपला किंवा एनडीएला नडणारा एकच पक्ष सध्यातरी राष्ट्रीय राजकारणात दिसतो तो म्हणजे काँग्रेस. याचा अर्थ इतर पक्ष भाजपला नडत नाहीत असे म्हणण्याचा मतलब नाही. पण, भाजप विरोधात कोणता पक्ष असा ठळकपणे सवाल केला तर उत्तर काँग्रेसच येईल. बाकीच्या भाजपविरोधी पक्षाचे राजकारण प्रासंगिक असते.हे आपल्याला नव्याने सांगण्याची गरज नाही. काँग्रेसचा इतिहास हा देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीपासूनचा आहे. त्यामुळे काँग्रेसला देशातील प्रत्येक कानाकोपरा माहीत आहे. अशा काँग्रेसला आज १४० वर्षे पूर्ण होतायत. १४० वर्षाच्या काँग्रेसने संविधान मुल्य जपली आणि पुढेही जपली जातील. सत्तेच्या सोपानासाठी काँग्रेसने कधीच लोकशाही मुल्याशी छेडछाड केली नाही. असे त्यांच्या सत्ताकाळातील निर्णयावरून लक्षात येते.पण, जनतेच्या लक्षात कधी येईल? हा प्रश्न. आज गांधी -गांधी म्हणून जंगजंग पछाडलेल्या भाजपने राष्ट्रीय रोजगार हमी योजनेचे गांधी यांचे नाव बदलून टाकले आहे. व्यक्ती द्वेषाचे राजकारण देश रसातळाला गेला तरी सुरू आहे. काँग्रेसच्या इतिहासात गांधी परिवाराचे देशासाठीचे योगदान अनन्यसाधारण आहे. जनतेच्या हिताच्या निर्णयासाठी काँग्रेसने कधीच तडजोड केली नाही. प्रसंगी पक्षाला त्यांनी पणास लावले. गांधी परिवारातील हत्या आणि विद्यमान विरोधी पक्षनेते खा.राहुल गांधी यांचा त्याग कुणासाठी हे काँग्रेसींना आणि देशातील जनतेला अवगत झाले तर काँग्रेस पक्षाचे आजचे चित्र बदलायला वेळ लागणार नाही.हे देशासाठी आणि काँग्रेससाठीही.

– पदमाकर उखळीकर ,

(लेखक मुक्त पत्रकार आहेत.)

मो.९६३७६७९५४२.

kalpadmakarukhlikar@gmail.com.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here