मानवत(प्रतिनिधी) :तालुक्यातील केकरजवळा येथे रविवारी(दि. २९) रात्री अज्ञात व्यक्तीकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा अनधिकृत पुतळा उभारण्यात आल्याची घटना उघडकीस आली. ही बाब समजताच परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. संभाव्य अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिस प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

सोमवारी सकाळी पोलिस प्रशासनाच्या उपस्थितीत सदर पुतळा हटविण्यात आला. यावेळी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. गावात तणावपूर्ण शांतता आहे. या संदर्भात पोलिस निरीक्षक संदीप बोरकर यांनी माहिती देताना सांगितले की, पुतळा कोणी व कशा परिस्थितीत बसविला याचा तपास सुरू असून संबंधितांची चौकशी केली जात आहे. कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.गावातील अनेक नागरिकांनी या प्रकाराबाबत कोणतीही माहिती नसल्याचे स्पष्ट केले. गावातील शांतता व सामाजिक सलोखा कायम राखण्यासाठी नागरिकांनी पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे. परिस्थिती नियंत्रणात असून परिसरात शांतता असल्याचे पोलिस प्रशासनाने सांगितले.
