Home सामाजिक कर्तृत्व, मेहनत अन् गुणवत्तेच्या जोरावरच जगणं सुंदर होणं शक्य- व्याख्याते गणेश शिंदे : परभणीत आई महोत्सवाला प्रारंभ; पाहिले पुष्प गुंफले

कर्तृत्व, मेहनत अन् गुणवत्तेच्या जोरावरच जगणं सुंदर होणं शक्य- व्याख्याते गणेश शिंदे : परभणीत आई महोत्सवाला प्रारंभ; पाहिले पुष्प गुंफले

कर्तृत्व, मेहनत अन् गुणवत्तेच्या जोरावरच जगणं सुंदर होणं शक्य- व्याख्याते गणेश शिंदे : परभणीत आई महोत्सवाला प्रारंभ; पाहिले पुष्प गुंफले

परभणी ता.22(प्रतिनिधी)माणसं लक्षात राहतात ती गुणांनी व कर्तृत्वाने, वरवरच्या गोष्टींनी माणसं मोठी होत नाहीत. तर कर्तृत्व, मेहनत अन् गुणवत्तेच्या जोरावरच आपलं जगणं सुंदर व समृद्ध होऊ शकते, असे प्रतिपादन महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते गणेश शिंदे (अहिल्यानगर) यांनी केले.

मानव सेवा विकास प्रतिष्ठानच्या वतीने स्त्रीशक्ती, मातृत्व आणि कर्तृत्ववान मातांच्या योगदानाला उजाळा देण्यासाठी परभणी शहरातील समाधान नगरात श्री राजीव गांधी विद्यालयाच्या प्रांगणात दि. २१ ते २३ जानेवारी दरम्यान तीन दिवसीय आई महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

महोत्सवाच्या पहिल्या दिवशी बुधवारी (दि. २१) संध्याकाळी व्याख्याते गणेश शिंदे यांचे “जीवन सुंदर आहे” या विषयावर प्रेरणदायी व्याख्यान झाले. त्यांनी व्याख्यानातून जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याचा संदेश दिला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय बाल विद्या मंदिर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ॲड. न. चि.जाधव हे होते. याप्रसंगी राष्ट्रवादी शिक्षक संघाचे विभागीय अध्यक्ष केशव दुधाटे, सेवानिवृत वैद्यकीय अधिकारी डॉ.शांताबाई दत्तात्रेय वाघमारे (पूर्णा), सत्कारमूर्ती चंद्रकलाबाई शिवाजी कदम, सुनीता वै.धूळगुंडे, सविता नवनाथ फड, ज्येष्ठ नागरिक केशवराव भुसारे, गोपाळराव भुसारे, वाशीमचे शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे यांची प्रमुख उपस्थिती होती.

व्याख्याते शिंदे पुढे बोलताना म्हणाले की, भावी पिढी सुसंस्कृत व्हावी यासाठी मुलांनी चांगले शिक्षण घेऊन मोठी स्वप्नं पाहावीत. त्यांनी चाकोरीबाहेरचा विचार करून उद्योग, व्यवसायात आलं पाहिजे. ज्ञान आणि अर्थार्जनाला आता कुठल्या भिंती उरल्या नाहीत. सामाजिक व आर्थिक परिस्थिती बदलण्यासाठी शिक्षणाइतका प्रभावी पर्याय नाही. जिद्द व मेहनतीच्या बळावर निश्चित यश मिळवता येते मात्र त्यासाठी पालकांनी हंटर घेऊन मुलांच्या मागे लागता कामा नये. आपले शेतकरी उत्पादन चांगले घेतात परंतु त्यांना विक्रीची कौशल्ये आत्मसात करता आली पाहिजेत. काळ आणि वेळेनुसार स्वतःला बदलण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञान शिकायला हवे. आपण सगळेजण वेगळे आहोत, आपल्यातील वेगळेपण ज्या दिवशी सापडेल तेव्हा जगणं सुंदर होईल, असेही ते म्हणाले. निसर्ग, समाज आणि अर्थकारण या तीन विषयांना स्पर्श केल्याशिवाय आपलं जगणं सुंदर करता येत नाही. आम्ही आमच्यात इतके गुरफटलो आहे की समाज, नातीगोती सहवास, सगळे विसरलो आहे. त्यामुळे ऐकमेकांना वेळ द्या, एकमेकांना भेटा, एकमेकांशी बोला. नाती जपा असे आवाहनही व्याख्याते शिंदे यांनी यावेळी केले.

प्रास्ताविक आई महोत्सवाचे संयोजक तथा शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे यांनी केले. आईच्या मायेचा, त्यागाचा आणि कर्तृत्वाचा गौरव म्हणून चंद्रकलाबाई शिवाजी कदम, सुनीता वै.धूळगुंडे, सविता नवनाथ फड यांना मान्यवरांच्या हस्ते मानपत्र व शाल, श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. मानपत्रांचे वाचन डॉ.दिलीप शृंगारपुतळे, सुभाष ढगे, बबनराव आव्हाड यांनी केले. मुख्य वक्त्यांचा परिचय बाळू बुधवंत यांनी करून दिला. सूत्रसंचलन डॉ.दिलीप शृंगारपुतळे तर आभार प्रदर्शन कवी केशव खटिंग यांनी केले. कार्यक्रमाला महिला व पुरुष नागरिक तसेच शालेय विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संखेने उपस्थित राहिल्या

 

आज समारोप; कवी प्रशांत मोरे यांचा भावस्पर्शी कार्यक्रम

महोत्सवाच्या समारोपाच्या दिवशी शुक्रवारी (दि. २३) महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी प्रशांत मोरे यांचा “आई तुझा हात परिसर हा” हा भावस्पर्शी कार्यक्रम सादर होणार आहे. या कार्यक्रमातून आई आणि माणूस यांच्यातील नात्याचा भावनिक पदर उलगडला जाणार आहे. आईच्या कर्तृत्वाला, मातृत्वाच्या मूल्यांना आणि स्त्रीशक्तीच्या सन्मानाला समर्पित असलेला हा महोत्सव परभणीकरांसाठी एक प्रेरणादायी पर्व ठरला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here